पुणे – देशातील आयआयटीसह विविध केंद्रीय संस्थांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या जेईई ऍडव्हान्स परीक्षा आता 3 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे.
आयआयटी, एनआयटी या संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची जेईई ऍडव्हान्स परीक्षा घेण्यात येते. यातूनच गुणवत्तेनुसार देशातील नामंवत आयआयटीमध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळे जेईई ऍडव्हान्स ही परीक्षा महत्त्वाची आहे. ही परीक्षा यापूर्वी करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. आता या परीक्षेची तारीख खुद्द केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे शक्य होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत ही परीक्षा घेतली जाणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले आहे.