पुणे – खडकवासला धरण 100 टक्के भरल्यानंतर आता पानशेत धरण पूर्णक्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. पानशेत धरण 9.11 टीएमसी म्हणजे 86 टक्के भरले आहे. तर वरसगाव धरण 75 टक्के आणि टेमघर धरण 64 टक्के भरले आहे. सद्य:स्थितीत खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत एकूण 23 टीएमसी म्हणजे 79 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला असून 3 हजार 424 क्युसेकने पाणी नदीत सोडले जात आहे.
धरण परिसरात सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. टेमघर धरणात 40 मिमी, वरसगावमध्ये 23 मिमी, पानशेतमध्ये 24 मिमी आणि खडकवासला धरण परिसरात 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरणातून कालव्याद्वारेसुद्धा पाणी सोडण्यात येत आहे. 1 हजार 155 क्युसेकने पाणी कालव्यात सोडले जात आहे. खडकवासला धरणात 1.97 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर पानशेतमध्ये 9.11 टीएमसी, वरसगावमध्ये 9.60 टीएमसी आणि टेमघरमध्ये 2.34 टीएमसी पाणी आहे.