मुंबई : मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. त्यानंतर आता राज ठाकरे पुण्यात दाखल झाले असून शनिवारी हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती करणार आहेत. तसेच सामूहिक हनुमान चालिसादेखील पठण करण्यात येणार आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एक भाष्य केले असून त्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
“याला सर्वधर्म समभाव म्हणतात. सगळ्यांचा सन्मान ठेवणे आणि सर्वांना समानतेने वागवणे याची ही पद्धत आहे. ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मी आता तुम्हाला पुढचा प्लॅन सांगतो, आता राज ठाकरे एका बाजूने हा आग्रह करणार आणि थोड्या दिवसाने ओवीसी हे पिक्चरमध्ये येणार,यामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा, त्याही पुढे काही तरी अघटित घडविण्याच्या प्रयत्नांची ही सुरूवात आहे.
महाराष्ट्रला या गोष्टी हळूहळू दिसतील. महाराष्ट्रात पेट्रोल,डिझेल, सिमेंट,स्टील महागाई याबाबतची चर्चा होत नाही. पण हनुमान चालीसाची चर्चा होते. आम्ही हनुमान,रामाचे ही भक्त आहोत,पण आम्ही याच कधी प्रदर्शन करीत नाही. त्यामुळे अंत्यत जाणीवपूर्वक राजकारणासाठी देवांना वापरणे हे आम्ही कधी केलेल नाही,” असे जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, मनसेने शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त पुणे शहरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या महाआरतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. अलीकडेच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि देशभरातील मशिदींबाहेरील लाऊडस्पीकरच्या विरोधात भूमिका घेतली आणि ३ मेपर्यंत ते हटवण्याची मागणी केली आहे.