मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील आपल्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची आज भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी आमदारांना बसण्याच्या आसन व्यवस्थेबाबत देखील नार्वेकर यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजते.
अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची आसन व्यवस्था सरकारच्या बाजूने करण्यात आली आहे.
त्याचबरोबर या आमदारांना व्हीप जारी करत शरद पवार गटाच्या वतीने अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. याच याचिकेवर जयंत पाटलांनी विधानसभेच्या अध्यक्षांशी चर्चा केली आहे. नार्वेकरांसोबतच्या या भेटीत पाटील यांच्या सोबतच आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते.
वाद न्यायालयात जाण्याची शक्यता कमीच
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील काका-पुतण्यातील हा वाद न्यायालयात जाण्याची शक्यता कमीच असल्याचे सध्या तरी दिसत आहे. शरद पवार यांची भेट घेत अजित पवार गटाने सामोपचाराने प्रश्न सोडवण्याची भूमिका मांडली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाच्या वतीने विधानसभा अध्यक्षांकडे या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली असली तरी हा वाद अद्याप तरी न्यायालयात जाणार नसल्याची चिन्हे आहेत.
या आधी शिवसेनेचा वाद न्यायालयात गेला होता त्यानंतर घडलेला घटनाक्रम सर्वांना माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अशा प्रकारे काही होऊ नये, याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून केला जात असल्याचे चित्र आहे.