वाई -जगभरासह देशात करोनाने थैमान घातले आहे. सातारा जिल्ह्यातही करोनाबाधित रुग्णांची संख्या 80 वर जाऊन पोहोचली आहे. मात्र तरीही करोनाचे गांभीर्य ग्रामीण भागातील काही गावांमध्ये फारसे दिसत नाही. ही बाब ओळखूनच बावधन गावातील सैन्यदलातील जवान यात्रेसाठी आले आणि लॉकडाऊनमुळे इथेच अडकून पडले आहे. त्यांनी गावाला करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी खडा पहारा देण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे करोनावर मात करण्यासाठी गावाला या जवानांनी प्रबोधनही केले आहे.
चीनच्या वुहान शहरापासून सुरु झालेली करोनाची साथ काही महिन्यांमध्येच जगभरात पसरली. जगात लाखो लोक या करोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारतातही करोनाने कहर सुरु केला असून महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातही करोनाचे 80 हून अधिक रुग्ण झाल्याने जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. अगदी ग्रामीण भागातील गावांमध्येही करोनाचे रुग्ण सापडल्याने वाई तालुक्यातील बावधन गावातील सैन दलात असलेल्या तरुणांनी आपल्या गावाला करोनापासून लांब ठेवण्यासाठी निर्धार केला आहे. सध्य पुण्या, मुंबईसह इतर ठिकाणी असणारे लोक लॉकडाऊन शिथिल केल्याने गावाकडे येऊ लागले आहेत. या लोकांमुळे गावातील लोकांना करोनाची लागण होण्याची दुर्दैवाने शक्यता व्यक्त होत आहे.
त्यामुळे गावच्या ग्रामदैवताच्या यात्रेला आलेले मात्र लॉकडाऊन सुरु झाल्याने गावातच अडकल्याने बावधनमधील सैन्यदलात असलेल्या जवानांनी गावाच्या प्रवेशद्वारासह गावात येणाऱ्या इतर रस्त्यांवर खडा पहारा देण्याचा निर्धार केला आहे. या जवानांच्या मदतीला गावातील तरुणांनीही पुढाकार घेतला आहे. सध्या बावधनमधील या जवानांची तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे.
या जवानांनी गावातच राहून देश सेवा करायची ठरवलं आणि गावातील प्रत्येक चौकामध्ये, आळीमध्ये तसेच वाड्यावस्त्यांवर सर्व फौजीनी रूट मार्च काढला, अनेक ठिकाणी चौकांमध्ये त्यांना गर्दी पाहायला मिळाली, त्या सर्वांना त्यांनी समजावून सांगितले, घरातच राहण्यास विनंती केली, शासनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आणि बघताबघता संपूर्ण बावधन गावातील चौक, रस्ते, चावडी, पार, निर्मनुष्य केले.