आळंदी -गेली सातशे वर्षांची परंपरा असलेला पालखी सोहळा होणार असल्याबाबत एकमत झाले आहे. पालखीची वैभवशाली परंपरा खंडित न करता 10 ते 12 वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळे आणण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून शासनाच्या सूचनाचे तंतोतंत पालन केले जाईल; मात्र याचे नियोजन आणि स्वरुपाबाबत शासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.
संपूर्ण देशात करोनाच्या लढाईत शासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी कार्यरत असल्याने पालखी सोहळ्याबात दिरंगाई होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने आज (बुधवारी) सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली.
यावेळी पालखी सोहळ्याशी निगडित सर्व घटकांशी चर्चाअंती असे मत झाले आहे की, पालखी सोहळा रद्द होणार नाही.
गेली सातशे वर्षांच परंपरा जपली जाणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यात सहभागी समाजाचे आणि वारकरी यांचे आरोग्य लक्षात घेऊन पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा होणार की नाही याविषयी शासनाशी चर्चा करून अंतिम निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल. यावेळी देवस्थांचे सर्व विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, मालक दिंडी चालक, चोपदार, पुजारी, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी व इतर सर्व संबंधित घटक उपस्थित होते.