नवी दिल्ली – महाराष्ट्रातील करोनाची स्थिती गंभीर आहे. केंद्र सरकार राज्यांनी केलेल्या उपाययोजनांचा पाठपुरावा करत आहे. ज्या भागात करोनाचा सामना करण्यात राज्यांना अडचणी येत आहेत, तेथे आवश्यक पाठिंबा देण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत, असे म्हणत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील करोनाची स्थिती आपल्या सर्वांसाठी एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. महाराष्ट्रातील 36 पैकी 34 जिल्हे करोनाबाधित झाले आहेत. तसेच राज्यातील करोनाबाधितांचा आकडा 14 हजारांपेक्षा अधिक आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. 34 जिल्ह्यापैकी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि सोलापूर या जिल्ह्यामधील स्थिती बिकट आहे. तर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात करोना एकही रुग्ण नाही, याबद्दल आनंद असल्याचे हर्ष वर्धन यांनी सांगितले.
गोंदिया आणि उस्मानाबादमध्ये गेल्या 28 दिवसांपासून नवीन रुग्ण आढळले नाहीत. गेल्या 21 दिवसांत बीडमध्ये कोणतेही नवीन रुग्ण आढळले नाहीत. गेल्या सात दिवसांपासून अहमदनगर व भंडारा येथे कोणतेही नवीन करोनाबाधीत रुग्ण आढळले नाहीत. सर्व जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये रुपांतरित करण्याचे आमचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.