खड्डे बुजवण्यासाठी मुरुमाचा सर्रास होतोय वापर; सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार
ओंकार दळवी
जामखेड – शहरातून जाणाऱ्या नगर – बीड – करमाळा – हैद्राबाद महामार्गावर जागोजागी पडलेल्या लहान मोठ्या खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या संदर्भात दैनिक “प्रभात’मध्ये झळकलेल्या वस्तुनिष्ठ वृत्ताची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली असून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. मात्र, या खड्ड्यांमध्ये मातीमिश्रित मुरुम टाकून थातूरमातूर डागडुजी केली जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे खडी व डांबराने बुजविण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जामखेड शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील खड्ड्यांच्या संदर्भातील 6 नोहेंबरच्या दैनिक “प्रभात’मध्ये जामखेड शहरातील रस्ते उठले वाहन धारकांच्या जीवावर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने नगर रोड, बीड रोड, खर्डा रोड रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, त्यासाठी मातीमिश्रित मुरुमाचा वापर केला जात असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. परतीच्या पावसानंतर जामखेड शहरातील सर्वच प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची स्थिती बकाल झाली आहे. खर्डा रोड, बीड रोड, नगर रोडवर काही ठिकाणी तर डांबरीकरणाच्या रस्त्याला गाव रस्त्याचे स्वरूप आले आहे. शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर मोजता येणार नाहीत, इतके चार ते पाच फूट लांब व सव्वा फुटापर्यंत खोलीचे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची हाडे खिळखिळी झाली आहेत. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप वाहन धारकांमधून होत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यामुळे शहरात दररोज कुठल्या ना कुठल्या वाहनाचे होतच असते. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी पसरली असून मुरूमऐवजी खडी व डांबर टाकून खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात येत आहे. या सर्व महामार्गाची दोन वर्षात अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नगर, बीड, उस्मानाबाद, हैद्राबाद, करमाळा जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यात अवजड वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे या रस्त्याचे भरभक्कम काम करावे, अशी मागणी होत आहे. शहरातील काही रस्त्यांवरील खड्डे हे मुरूम टाकून बुजवण्यात आले. परंतु, पावसामध्ये मुरूम भिजल्यामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार व पादचारी घसरून पडत आहेत. मात्र, त्यानंतर देखील खड्डे बुजविण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र आहे.अद्यापही शहरातील बहुतांश रस्त्यावरील खड्डे कायम असून, या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्याचा देखील वाहन चालकांना त्रास होत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीमिश्रित मुरुम टाकण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. त्यामुळे या खड्ड्यांची परिस्थिती पुन्हा “जैसे थे’ अशीच होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी मुरुमावर खर्च केला जात असला तरी हा खर्च पाण्यात जाणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महामार्गाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव नगर कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे अधिकारी सांगतात. सध्या निवडणुकांची धामधूम असल्याने केवळ थातूरमातूर खड्डे बुजवून मलमपट्टी केली जात आहे. मुरूम टाकून खड्डा बुजवणे, खड्ड्यात खडी टाकणे, असे जुजबी उपाय सार्वजनिक बांधकामकडून करण्यात येतात. मात्र, अशा पद्धतीने बुजविलेल्या खड्ड्यातून रस्ता काढताना वाहनचालकांचे जास्तच हाल होतात.
ते शहराचे वाटोळेकरीच
“नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीइतकेच त्या पावसाळ्यात रस्त्यांवरच्या खड्ड्यात जीव जात असतो हे अंगवळणी पडलेय.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रातील रस्ते आणि त्यावरचे खड्डे यावर होणारा खर्च लक्षात घेतला तर हा सारा पैसा जातो कुठे जातो? यादी काढा. तेच ठेकेदार, तीच टक्केवारी आणि दरवर्षी तोच चिखलमय अनुभव… सर्वाधिक खर्च टक्केवारीत मुरते हे उघड सत्य आहे. योग्य नियोजन होत नाही. हे मुळ दुखणे आहे. शहराचे कारभारी आणि बांधकामचे अधिकारी शहराचे वाटोळेकरी, असे खेदाने म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे.