नवी दिल्ली – जपान सरकार आणि कंपन्यांची गुंतवणूक असलेले अनेक प्रकल्प भारतामध्ये रखडले आहेत. हे प्रकल्प वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करण्यासाठी भारत सरकारच्या मदतीची अपेक्षा असल्याचे जपानचे उपअर्थमंत्री हिरोसे नाओशी यांनी सांगितले.
भारतीय उद्योग महासंघाने परकीय गुंतवणुकीवर आयोजित केलेल्या परिसंवादात बोलताना त्यांनी सांगितले की, भारतात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्यामुळे जागतिक गुंतवणूक भारताकडे आकर्षित होत आहे. मात्र ही गुंतवणूक कायम ठेवण्यासाठी प्रकल्प वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण होण्यात असलेले अडथळे भारत सरकारने दूर करण्याची गरज आहे.
जपानमधील कंपन्यांनी भारतामध्ये 200 ठिकाणी प्रकल्पात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. मात्र यातील बरेच प्रकल्प सुरू होण्यात अडथळे येति आहेत. भारतात मॅन्युफॅक्चरिंग वाढत असून भारतातून निर्यातही वाढण्याची शक्यता आहे. मात्र गुंतवणुकीसाठी इतर देशाशी भारताला स्पर्धा करावी लागत आहे. त्यासाठी हे प्रकल्प वेळेत पूर्ण होणे गरजेचे असते.