जामखेड तालुका भाजपचे तहसीलदारांना निवेदन
जामखेड (प्रतिनिधी) – कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडीचे सरकार पूर्णपणे अपयशी झाले असल्याच्या निषेर्धात सरकारला लवकरात लवकर जाग यावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात यासाठी जामखेड तालुका भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले कि, कोविड १९ महामारीवर उपाययोजना करण्यात आणि प्रशासकीय गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारच्या अकार्यक्षम धोरणांमुळे राज्यातील कोरोनाचा विळखा आणि मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याने स्वत: कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही . केंद्रसरकारने केलेल्या मदतीवर आभार व्यक्त न करता फक्त टिका करण्यात हे सरकार धन्यता मानत आहे.स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड, शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या,गरिबांना रेशनधान्य न मिळणे, आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली असणे, रुग्णसंख्या लपविणे, मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन न करणे,इतर सर्व राज्य विविध घटकांसाठी पॅकेज देत असताना राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवीत आहे राज्यातील पोलिसांची अवस्था तर अतिशय विदारक आहे. त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. कोरोनाचे संकट हाताळण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. सरकारला लवकरात लवकर जाग यावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात.
यावेळी निवेदनावर भाजपा जामखेड तालुकाध्यक्ष अजय काशिद, पंचायत समिती सभापती रवी सुरवसे ,माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, जि प सदस्य खर्डा अनिल लोखंडे ,सरचिटणीस लहुजी शिंदे, नगरसेवक बिभीषण धनवडे , माजी पं स सदस्य शरद कार्ले, गोरख घनवट , बिटू मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.