जामखेड (प्रतिनिधी) – रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात गेल्या सात दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांच्यासह शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनीचे आंदोलन सुरू आहे.
राष्ट्रवादी काँगेसच्या युवती पदाधिकारी संध्या सोनवणे यांनी थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची तातडीने दाखल घेऊन राज्य महिला आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कडक कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे डॉ. भास्कर मोरे यांच्या अडचणी वाढणार आहेत
गेल्या सात दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या शेकडो विद्यार्थ्यांचे भास्कर मोरे विरोधातआंदोलन सुरू आहे. या आंदोलन शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले हेही उपोषणास बसले आहेत. डॉ मोरे हे आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास देतात.
याबाबत आरोग्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. जोपर्यंत डॉ. मोरे याना अटक होत नाही व कॉलेजवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा शिवप्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांच्यासह विद्यार्थ्यांनी घेतला होता. याप्रकरणी डॉ. भास्कर मोरे विरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला आहे.
राष्ट्रवादी काँगेसच्या युवती पदाधिकारी संध्या सोनावणे यांनी आंदोलनाला भेट देऊन तक्रारी जाणून घेऊन तातडीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घटनेची माहिती दिली हेाती. यावेळी चाकणकर यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विद्यार्थिनींशी संवाद साधला. अनेक विद्यार्थिनींनी मोरे यांच्या कारनाम्याचा पाढाच चाकणकर यांना सांगितला.
यावेळी राज्य महिला आयोग विद्यार्थीनीच्या पाठीशी असल्याची ग्वाही चाकणकर यांनी दिली होती. त्यानंतर दि. ११ रोजी राज्य महिला आयोगाने आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जामखेडमध्ये सुरू असलेल्या या प्रकरणाबाबत पत्र लिहिले आहे.या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.
सदरील प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे असून योग्य ती चौकशी करून कारवाइ करून कार्यवाहीचा अहवाल तत्काळ राज्य महिला आयोगाकडे पाठविण्यात यावा, असे पत्रात म्हटले आहे. याबाबत चाकणकर यांनी सदरील पत्र ट्विट करत पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत