जामखेड,(प्रतिनिधी) – डाॅ. भास्कर मोरे आमच्या प्रत्येक वैयक्तिक गोष्टीत लक्ष घालतो. त्याच्या मनासारखे वागले नाही तर रिव्हाॅल्वर काढून मुलींना मारण्याच्या धमक्या देतो. आमचे आयुष्य खराब केले आहे. आम्हाला भयंकर त्रास देऊन खूप छळलयं, असे म्हणत अमानवी माणुसकीला काळिमा फासणार्या मात्र न सांगता येणार्या कृत्याचा पाढा वाचत असतानाच मुलींना आ. रोहित पवार व अधिकाऱ्यांसमोरच रडू कोसळले.
गेल्या आठ दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात सातव्या दिवशी आ. रोहित पवार यांनी विद्यापीठ प्रतिनिधी तसेच प्रशासनातील अधिकारी, आंदोलनकर्ते विद्यार्थी व उपोषणकर्ते शिवप्रतिष्ठानचे पांडुराजे भोसले यांच्याबरोबर सुमारे पाच तास चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांनी भास्कर मोरे यांच्या अमानवी मानुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा न सांगता येणाऱ्या कुकृत्याचा पाढा वाचला.
छळवणुक झालेल्या विद्यार्थिनींनी सांगितले की, आम्ही मागीलवेळी पाच मुलींनी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिले मात्र पोलिसांना दिलेले तक्रारी अर्ज पोलिसांकडून डॉ. भास्कर मोरेकडे गेले. त्या तक्रार अर्जावरून त्याने कॉलेजच्या मुलींना त्रास दिला. जिथे पोलिसांकडूनच सुरक्षिततेच्या बाबी सांभाळल्या जात नाहीत. तिथे आम्ही मुली कशा थांबणार. आम्हाला हे मेडिकल काॅलेज सुरक्षित वाटत नाही.
कॉलेजमध्ये कसलाही भ्यासक्रम शिकवला जात नाही. कॉलेज तपासणीसाठी विद्यापीठाची समिती आल्यावर आम्हाला रुग्ण बनवून सलाईन लावले जाते, मग न शिकवता डिग्री अशीही भेटणार आहे. फक्त पैसे भरा व मोकळे व्हा, असे भास्कर मोरे मुलींना सांगतो. अन् सांगितले ते नाही केले तर…असे सांगतांना अक्षरश मुलींना रडू कोसळले. त्यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले.
सिनियर मुलींकडून ज्युनिअर मुलींना जबरदस्तीने शिकविण्यास भाग पाडले जाते. बाहेरून आलेल्या पाहुण्यांना या विद्यार्थीनी माझ्या मुलीसारख्या आहेत. स्वच्छ प्रतिमा स्वतःहून सांगतो अन् माझी मुलगी म्हणतो नंतर त्याच मुलींबरोबर फ्लर्ट करतो. लज्जास्पद बोलतो. विद्यार्थी अन् शिक्षक या नात्याला मोरे याने कलंक लावला आहे.
आम्हाला आमचे कॉलेज बदलून मिळाले नाही तर आम्ही जीवनाचं बरं वाईट करू, असा इशारा रत्नदीपच्या उपोषणकर्त्या मुलामुलींनी दिला आहे. एका मुलीने सांगितले की, मुली फिर्याद दाखल करायला तयार आहेत तर पोलीस म्हणतात नंतर करू, नंतर बघू असं वारंवार सांगून टाळाटाळ करतात.
मुलींच्या सर्व धक्कादायक प्रकार ऐकल्यानंतर आ. रोहित पवार म्हणाले की, मुलींनी तक्रार केलेली व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याच्यावर कारवाई होणारच. रत्नदीपच्या मुलांमुलींच्या शैक्षणिक जीवनाचा प्रश्न असून, कोणीही राजकारण आणू नये. तसेच आ. रोहित पवार हा तुमचा मोठा भाऊ म्हणून आज आणि पुढेही तुमच्या बरोबर न्यायासाठी लढायला उभा आहे. तुमचे कॉलेज ट्रान्सफर करण्याचा पर्ण प्रयत्न करू. जामखेड- कर्जतचे नागरिक चांगले आहेत म्हणूनच बाहेरगावच्या मुलामुलींच्या पाठीशी एकजुटीने उभे असल्याचे आश्वस्त केले.