दोहा – दोहा येथे शनिवारी झालेल्या इंट्रा-अफगाण वाटाघाटीच्या उद्घाटन सत्रात परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर व्हिडिओ टेलिकॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. कतारचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद बिन अब्दुल्रहमान बिन जसीम अल थानी यांनी आमंत्रण दिल्याने जयशंकर या परिषदेमध्ये सहभागी झाले होते.
डॉ. जयशंकर यांनी आपल्या भाषणात भारत आणि अफगाणिस्तानमधील सहस्रावधीच्या संबंधांचा उल्लेख केला. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानचे संबंध काळाच्या कसोटीवर टिकून राहिले आहेत, असे जयशंकर म्हणाले.
आपल्या भाषणात त्यांनी अफगाणिस्तानातील 34 प्रांतांमध्ये पूर्ण झालेल्या 400 हून अधिक विकास प्रकल्पांमध्ये प्रमुख विकास भागीदार म्हणून भारत असण्यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. अफगाणिस्तानाबाबत भारताचे धोरण स्थिर होते. कोणतीही शांतता प्रक्रिया अफगाण-नेतृत्वाखाली, अफगाण-मालकीची आणि अफगाण-नियंत्रित असणे आवश्यक आहे.
तसेच अफगाणिस्तानाच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करावा लागेल आणि इस्लामिक रिपब्लीक ऑफ अफगाणिस्तानाच्या लोकशाहीतील प्रगती जपली गेली पाहिजे, असेही जयशंकर यांनी सांगितले.
अल्पसंख्याक, महिला आणि समाजातील असुरक्षित घटकांचे हित जपले जाणे आवश्यक आहे. देश आणि त्याच्या आसपासच्या भागातील हिंसाचाराच्या प्रश्नावर प्रभावीपणे लक्ष देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.