कराड तालुक्यातील विविध गावांमधील स्थिती
कराड – कराड शहरासह तालुक्याचा परिसर गेल्या चार दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे गारठला आहे. या थंडीत काही प्रमाणात तरी ऊब मिळावी यासाठी परिसरात रात्रीच्यावेळी सर्वत्र शेकोट्या पेटत आहेत. त्यामुळे थंडीचा झालाय कहर, शेकोट्याना आलाय बहर असे चित्र तालुक्यात दिसू लागले आहे.
यंदा मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी मुरले आहे. तसेच परिसरातील सर्व पाझर तलाव, विहिरी, ओढे यंदाच्या पावसाने भरभरून वाहिले आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम थंडीवर झाला आहे.
गेल्या चार दिवसांमध्ये रात्रीसह दिवसाही थंडीची तिव्रता वाढली आहे. घरातून बाहेर पडताना थंडीपासून बचावासाठी नागरिक स्वेटर, मफलर, हातमोजे घालत आहेत. परिणामी वाढत्या थंडीमुळे स्वेटर, रग, मफलर, कानटोपी यांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढलेला आहे.
पहाटेच्या वेळी या बोचऱ्या थंडीमुळे धुक्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसह रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना या धुक्यामुळे पुढील काही दिसून येत नाही. ही स्थिती सकाळी नऊ वाजेपर्यंत कायम राहत आहे.
सायंकाळी सहा वाजताच थंडीची तिव्रता वाढीस लागत आहे.त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या जाऊ लागल्या आहेत. या शेकोट्यांवर गप्पांचे फड रंगताना दिसत आहेत. तसेच रात्री झोपताना अंगात स्वेटर, मफलरसह घोंगडी, ब्लॅंकेटचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. सकाळी-सकाळी थंडी घालवण्यासाठी चहाच्या टपऱ्यांवर मोठी गर्दीही होत असते.
गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात दिवसभर आभाळ येत आहे. सायंकाळपर्यंत हीच स्तिथी आहे. मात्र या आभाळाचा थंडीवर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. उलट रात्री इतकेच थंड वातावरण दिवसही अनुभवावयास मिळत आहे. यंदा उन्हाळ्यात जास्त ऊन, पावसाळ्यात जास्त पाऊस पडला, आता हिवाळ्यातही जास्त थंडी पडू लागली आहे.