मुंबई: देशासह राज्यात लॉकडाउनचा कालावधी पुन्हा वाढवण्यात आला आहे. यामुळे देशासह राज्यातील अर्थव्यवस्थेचं चक्र ठप्प झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. अशा बिकट परिस्थितीमधून बाहेर पडून अर्थव्यवस्था सुरू करणे आवश्यक आहे, असे मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
फडणवीस म्हणाले, लॉकडाउनबाबत त्या त्या वेळी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागेल. त्याबाबत आता काहीही सांगणे शक्य नाही. पण लॉकडाउनमधून बाहेर पडून अर्थव्यवस्था सुरू करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रणामात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केला. तसेच राज्य सरकारने यात लक्ष घालून अधिकाऱ्यांमधील समन्वय वाढवला पाहिजे. सध्या सरकारने शैक्षणिक शुल्क किंवा कर वाढवण्याचा कोणताही विचार करू नये, असेही ते म्हणाले.
कंन्टेंन्मेट झोनच्या ज्या गाइडलाइन्स आहेत त्या सर्वांनी पाळल्या पाहिजेत. सरकारने करोनाग्रस्तांची संख्या लपवण्याच्या प्रकार करू नये. जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरे जावे. केंद्र सरकारने राज्याला आवश्यक ती मदत केली आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आतापर्यंत सर्वात जास्त मदत करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.