चेन्नई (तामिळनाडू) – भाजपच्या विरोधातील मतांमध्ये होणारी फाटाफूट टाळण्याची गरज असून त्यासाठी इंडिया आघाडीत एकजूट राखणे गरजेचे आहे असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी म्हटले आहे. शुक्रवारी तिरुचिरापल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना एमके स्टॅलिन म्हणाले की, भाजपला पुन्हा सत्तेत येऊ न देणे हे प्रत्येकाचे एकच ध्येय असले पाहिजे.
ते म्हणाले, त्याच उद्देशाने इंडिया आघाडीतील पक्षांनी कार्यरत राहीले पाहिजे अशी सुचना त्यांनी केली आहे. इंडिया आघाडीतील काही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे. पंजाबात आम आदमी पक्षाने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे. तसेच हरियाणातील विधासभेच्या सर्व ९० जागा स्वबळावर लढण्याचे त्यांनी निश्चीत केले आहे. तसेच संकेत लोकसभेच्या बाबतीत तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही दिले आहेत. या पाश्र्वभूमीर त्यांनी हे आवाहन केले आहे.