वळसे पाटील यांचे मत
मंचर- आजार बरा करण्यापेक्षा आजार होऊ नये याबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. आजारामुळे नागरिक खचून जातात. तसेच आजाराच्या विविध व्याधी निर्माण होत आहेत. त्यामुळे आजार होऊ नये याबाबत प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत कॅन्सर निदान शिबिर आळंदी देवाची येथील श्री नरसिंह सरस्वती मेडिकल फाउंडेशनचे इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट, डी. जी. फाउंडेशन, शरद सहकारी बॅंक मंचर, भीमाशंकर साखर कारखाना पारगाव, मोरडे फुड्स मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. त्यावेळी कॅन्सर निदान शिबिराच्या समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुषमा शिंदे, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. चंदाराणी पाटील, शरद बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योत्सना काकडे, बॅंकेचे संचालक दत्ता थोरात, उद्योजक अजय घुले, प्रकाश घोलप, लक्ष्मण थोरात, जगदीश घिसे, जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात, सविता बगाटे, शिरुर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, बाबासाहेब ठाकुर, डॉ. नितीन गोसावी, रुग्णकल्याण समितीचे सदस्य डी. के. वळसे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कॅन्सरचे प्रमाण आंबेगाव आणि खेड तालुक्यात जास्त असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. येथे 350 रुग्णांची तपासणी केली असता त्यातील 180 रुग्णांना कॅन्सरचे प्राथमिक निदान झाले आहे. ही बाब भूषणावह नसल्याचे सांगून वळसे पाटील म्हणाले की, विवाह समारंभ किंवा वाढदिवस इत्यादी ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात खर्च होतो. सत्काराला फाटा देवून होणाऱ्या बचतीतून मंचर उपजिल्हा रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत नागरिकांनी करावी. सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले तर सुषमा शिंदे यांनी आभार मानले.