कोपरगाव, (प्रतिनिधी)- भक्ती हा पराकोटीचा मार्ग आहे. ईश्वरीय साधना मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखवते, हे प्रत्येकाला समजत असूनही त्याची आवड निर्माण होत नाही. त्यामुळे कलियुगात दिवसेंदिवस समस्या वाढत आहे. भक्ताला प्रत्येक संकटातून मुक्त करतो तो भगवंत आहे, असे प्रतिपादन श्री गोदावरी धामचे (सराला बेट) महंत रामगिरी महाराज यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व ९५ व्या जयंती निमीत्त येथील संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. भक्ताच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी भगवान परमात्मा सदैव तत्पर असतात, मात्र त्यासाठी आपल्या मुखात त्याचे नामस्मरण आले पाहिजे.
मनाला सुमन बनवा म्हणजे भगवंत त्यात वास करेल. जीवन क्षणभंगुर आहे, हे प्रत्येकाला ज्ञात होऊनही हाव सुटत नाही. यशोदा मातेने भगवान श्रीकृष्णाला वात्सत्य दिले पण पुतना मावशीने शत्रुभाव दिला. भगवंताने त्या शत्रुभावाचा नाश केला. महर्षि वेदव्यासांनी श्रीकृष्ण भक्तीचा ग्रंथ श्रीमद् भागवत लिहिला आहे. मनुष्याने अहंकार नष्ट करावा म्हणजे सद्गुणी विचार अधिक बलवान होतात. जसं कर्म असतं तसं फळ मिळतं असतं. काळ बदलला तशी साधनेही बदलली, मात्र आपल्याकडे वेळ भरपूर आहे ते जाणून घ्या.
वृंदावन येथून आलेले कृष्णाजी महाराज यांनी बहारदार तांडव नृत्य करत भाविकांची मने जिंकली. गोवर्धन पर्वताची प्रतिकृती कार्यक्रमस्थळी करण्यात आली होती .छोट्या मुलांना श्रीकृष्ण, पेंद्या, सुदामा अशा विविध रुपाने सजविण्यात आले होते. भागवत कथा श्रवणासाठी बुधवारी महिलांनी गर्दीचा उच्चांक मोडून टाकला.
ज्ञानेश्वरनगर तहसील मैदान खचाखच भरले होते. नगरपालिका, पोष्ट कार्यालय इमारतीलगत मोकळ्या मैदानावर भाविकांची बसण्याची व्यवस्था करून तेथे थेट मोठे टी. व्ही स्क्रीन उभारून भागवत कथेचे प्रक्षेपण त्यावर दाखविण्यात येत आहे. गुरुवारी रुक्मिणी स्वयंवराचा सचित्र देखावा सादर करून रामगिरी महाराजांनी त्याची विस्तृत माहिती दिली.
आत्मा मालिक, राघवेश्वर देवस्थान आदी पंचक्रोशीतील संत-महंत मंडळींचे ईशान कोल्हे यांनी सपत्नीक संतपूजन केले. ईशान व श्रद्धा कोल्हे यांनी महंत रामगिरी महाराज यांचे संतपूजन केले.