मंचर – ओबीसी प्रश्नासंदर्भात जो महत्त्वाचा निर्णय करावयाचा आहे. तो सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यांचा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे अवघड आहे, असे मत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि. 5) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसार माध्यमांशी वळसे पाटील बोलत होते.
आंबेगाव तालुक्यात शरद पवार गट सक्रिय नसल्याबाबत ते म्हणाले की, राज्याची आणि गावची निवडणूक यात खूप फरक आहे. त्यामुळे यावर बोलणे योग्य नाही. तसेच ओबीसी प्रश्नासंदर्भात जो महत्त्वाचा निर्णय करायचा आहे, तो सर्वोच्च न्यायालयात आहे, त्याचा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय घेणे अवघड आहे. म्हणून त्या निवडणुका थांबलेल्या आहेत.
अजित पवार यांच्या आई यांनी भावना व्यक्त करताना आपला मुलगा माझ्या हयातीत मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली; मात्र त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणून त्या बोलल्या त्यांनी स्वतः हे सांगितलेले नाही. अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत ते म्हणाले की, आपण सध्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बोलू या, अशी प्रतिक्रिया वळसे पाटील यांनी दिली आहे. निरगुडसरचे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मला मतदान करतात. त्यामुळे त्यांना मतदान करणे हा माझा हक्क असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक छोटी असो वा मोठी…
निवडणूक छोटी असो वा मोठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक पातळीवरील असते गावातील विविध प्रश्न, समस्या मार्गी लावण्याचे काम ग्रामपंचायत करत असून गावातील प्रत्येक मतदाराने गावचा विकास करण्यासाठी योग्य उमेदवार निवडून देणे गरजेचे असल्याचे वळसे पाटील यांनी नमूद केले.