पुण्यप्रसून बाजपेयी : “राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदे’चा समारोप
पुणे – राजकारणामुळे देशातील सामाजिक, आर्थिक आणि राजकारणाचे क्षेत्र खूपच प्रभावीत झाले आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, सीबीआय आणि पार्लमेंटला सुद्धा त्यांच्या अधिकारांचा पूर्ण वापर करताना विचार करावा लागतो. अशा जात्यामध्ये माध्यमे कसे सुटू शकतील, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. माध्यमांकडून ज्या प्रकारे रिपोर्टिंग होत आहे त्यात शांती शोधणे अवघड आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयी यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “दुसरी राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेच्या’ समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आशितोष, प्रसिद्ध लेखक तथागत रॉय, तुघलकचे संपादक स्वामीनाथन गुरूमूर्ती, ले. जनरल अरविंदर सिंग लाम्बा (पीव्हीएसएम, व्हीएसएम) आणि लेखक राजीव मल्होत्रा हे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. एन. टी. राव, प्र-कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र-कुलगुरू प्रा. डी. पी. आपटे व अधिष्ठाता डॉ. अनुराधा पराशर उपस्थित होते.
पुण्यप्रसून वाजपेयी म्हणाले, सध्याच्या काळात पत्रकार संस्था ज्या प्रकारे काम करीत आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याजवळचे संबंध असणे गरजेचे झाले आहे. समजा तुम्हाला वृत्तपत्र काढायचे असेल तर आरएनआयशी जवळीक हवी. ही झळ जवळपास देशातील सर्वच क्षेत्रात पोहोचत आहे. टाटा कंपनीला मोठे नुकसान होत आहे, परंतु अंबानी आणि अदानी यांच्या सर्व कंपन्या फायद्यात आहे. त्याचप्रमाणे माध्यमांमध्येसुद्धा असे घडतांना दिसत आहे.
देशाला या सर्व गोष्टींपासून वाचवायचे असेल तर प्रशासन आणि पत्रकारांना समोर येणे गरजेचे आहे. तसेच, देशाला शिक्षित करावे लागेल. कारण विरोधी पार्टीचे नेते पार्लमेंटमध्ये गप्प बसलेले आहेत. मुख्य प्रवाहाचे संपादक देशात आज आपल्या कुवतीनुसार काही चांगले काम करतांनाही दिसत आहे. सध्याच्या काळात संपूर्ण जग हे भारतातील पर्यावरण, न्यूक्लियर मुद्दा आणि हुकुमशाही सत्तेकडे आ वासून पाहत आहे आणि आम्ही ते भोगत आहोत. सध्या या देशात कोल्ड वॉर सुरू आहे, ते थांबविण्यासाठी माध्यमांनाच कठोर भूमिका घेऊन कार्य करावे लागेल.