नवी दिल्ली – देशातील दिल्ली, मुंबई, बंगलुरू, आणि हैदराबाद या चार विमानतळांचे आधीच खासगीकरण झाले असून या विमानतळांमध्ये सरकारचे जे उर्वरीत भाग भांडवल आहे तेही विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यातून सरकारला सुमारे 2 लाख 50 हजार कोटी रूपयांचा निधी उभारता येणार आहे. या चार विमानतळांखेरीज देशातील उर्वरीत 13 मोठ्या विमानतळांमधील सरकारच्या एअरपोर्ट प्राधिकरणाचे भाग भांडवल काढून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सन 2021-22 या आर्थिक वर्षात ही प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. येत्या काहीं दिवसांत या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाणार आहे. भारतीय विमान पत्तन प्राधिकरण ही सरकारी मालकीची संस्था असून त्या संस्थेकडे देशातील शंभर विमान तळांची मालकी आहे. आता हे विमानतळ खासगी कंपन्यांना टप्प्याटप्प्याने विकले जात आहेत. यात अदानी उद्योग समुहाने देशातील सर्व महत्वाच्या विमानतळांवर आपला कब्जा केला आहे. मुंबईचा विमानतळ हा देशातला सर्वात महत्वाचा विमान तळ आहे. त्यातील 74 टक्के भाग भांडवल अदानी उद्योग समुहाने या आधीच विकत घेतले आहे. आता सरकारचे त्यातील भाग भांडवल 26 टक्के इतके उरले असून तेही भांडवल विकले जाणार आहे.