नवी दिल्ली – नंदीग्राम मधील प्रचाराच्यावेळी झालेल्या एका दुर्घटनेते तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी गंभीर जखमी झाल्या होत्या. तथापि ही घटना म्हणजे घातपात नव्हता असा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला असल्याची माहिती आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे.
राज्य सरकार आणि निवडणूक निरीक्षकांनी या घटनेच्या संबंधात जे अहवाल पाठवले आहेत, त्याचा अभ्यास करता ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षा यंत्रणेच्या गलथानपणामुळे त्या जखमी झाल्या आहेत असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. त्या या निवडणुकीतील स्टार प्रचारक असूनही त्या बुलेटप्रुफ किंवा आर्मर्ड व्हेईकल वापरत नाहीत. त्यांच्या सुरक्षेशी संबंधीत यंत्रणांनी त्यांच्या विषयी जी काळजी घ्यायला हवी होती ती त्यांनी घेतली नाही. गर्दीच्या ठिकाणी वाहनातून उतरत असताना त्या पडल्या आणि त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र आपल्याला अज्ञात व्यक्तींनी जोरात ढकलल्याने हा प्रकार घडल्याचा ममतांचा आरोप आहे.