मुंबई – तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीड तास चाललेल्या या चर्चेदरम्यान देशात निर्माण झालेल्या स्थितीत बदल घडवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
नेत्यांमध्ये नेहमीच राजकीय चर्चा होत असतात, मात्र आजची चर्चा वेगळी होती असे सांगत बेरोजगारी, गरिबीसारख्या समस्या कशा सोडवायला हव्यात यावर आमची चर्चा झाली. त्यासाठी देशात एक वेगळी परिस्थिती निर्माण केली पाहिजे आणि त्या दिशेने काम केले पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री केसीआर आणि शरद पवार यांच्यातील बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले की, देशात बेरोजगारी, गरिबी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा समस्या भेडसावत आहेत. या प्रश्नांवर आमची चर्चा झाली.
आम्ही राजकीय चर्चा फार केली नाही. आमची केवळ विकास, विकास आणि विकास यावरच चर्चा झाली. देशाची गरिबीपासून सुटका कशी होईल, यावर चर्चा झाली. ही सुटका होण्यासाठी एक वेगळी परिस्थिती निर्माण केली पाहिजे आणि त्यासाठी काम केले पाहिजे.