मुंबई –आयपीएल स्पर्धेच्या अमिरातीत सुरू असलेल्या दुसऱ्या पर्वातील सामन्यांत इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांची कामगिरी अत्यंत सुमार होत आहे. त्यामुळे आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवड झालेली असतानाही त्यांचे भारतीय संघातील स्थान धोक्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेले किशन व सूर्यकुमार यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सातत्याने अपयशी ठरत आहेत. या दोन्ही फलंदाजांना खेळपट्टीवर टिकूनही राहता आलेले नाही. गेल्या वर्षी मुंबईला विजेता बनवण्यात इशान आणि सूर्यकुमारचे मोठे योगदान होते. मात्र, यंदा हे खेळाडू धावांसाठी झगडताना दिसत आहेत.
त्यांच्यासह हार्दिक पंड्यालाही कामगिरी करता आलेली नाही या चारही खेळाडूंना आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले आहे. मात्र, तरीही त्यांची संघातून गच्छंती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सपशेल अपयशी ठरलेल्या पंड्यासह इशान आणि सूर्यकुमार यांनाही भारतीय संघात स्थान न देता अन्य खेळाडूंना स्थान देण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. इशानला मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये संधी दिली आहे.
यामधील 8 डावांमध्ये फलंदाजी करताना इशान किशनने अवघ्या 13.37 च्या सरासरीने 107 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार मुंबईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याने 16 सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांच्या मदतीने 480 धावा केल्या होत्या. मात्र, सूर्यकुमारने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सपशेल निराशा केली आहे.
मुंबईकडून तो यंदा 10 सामने खेळला आहे. त्यात त्याने केवळ 189 धावा केल्या आहेत. या चारही खेळाडूंची सुमार कामगिरी पाहता निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासाठी या चार खेळाडूंच्या निवडीचे समर्थन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.