चंदिगड – पंजाब सरकारने आज राज्यात वीज बिल माफीची घोषणा केली आहे. ज्यांचे वीज कनेक्शन्स 2 केव्हीपर्यंत आहेत अशांची वीज बिले राज्य सरकारने माफ करण्याचा निर्णय घोषित केला आहे. त्यातून राज्य सरकारच्या तिजोरीवर 1200 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
आज मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्या वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन बिल न भरल्याने तोडण्यात आले आहे, त्यांची कनेक्शन्स पुन्हा जोडली जाणार असून त्यांचे बिलही राज्य सरकार माफ करणार आहे.
आज राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील 80 टक्के ग्राहकांची वीज बिले माफ झाली आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी नंतर पत्रकार परिषदेत नमूद केले. वीज मंडळांना त्यांच्या थकीत रकमेची बाकी राज्य सरकारतर्फे अदा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.