मुंबई – महाराष्ट्रात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबतचे राजकारण अधिकच तीव्र होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आता भाष्य केले आहे. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, गुजरात पाकिस्तान आहे का, तो भारताचाही भाग आहे. आता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला आहे.
वेदांत आणि फॉक्सकॉनने 13 सप्टेंबर रोजी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केला होता. तेव्हापासून हा १.५४ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा करार वादात सापडला आहे. खरे तर, हा प्रकल्प पूर्वी महाराष्ट्रातील पुणे येथे होणे अपेक्षित होते.परंतु महाराष्ट्राऐवजी हा प्रकल्प गुजरातला गेल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरूनच आता आदित्य ठाकरेंनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र पाकिस्तान आहे का ? असा सवाल उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपने मला सांगावे की महाराष्ट्र पाकिस्तान आहे का? या प्रकल्पामुळे एक लाख नोकऱ्या गेल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला आहे. महाराष्ट्रातील तरुणांचा विश्वासघात केल्याचा आरोप देखील त्यांनी सरकारवर केला.