टाटा समूहाला बीसीसीआयने पुन्हा डावलले
मुंबई – करोनाचा धोका स्पर्धेत सहभागी होत असलेल्या खेळाडू व सपोर्ट स्टाफला बसू नये, यासाठी त्यांना बायो-बबल सुरक्षा देण्यात येणार आहे. याबाबतचे हक्क इंग्लंडमधील रेस्ट्राटा या कंपनीला देण्यात आले आहेत.
जगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आयपीएलसाठी बायो-बबल सुरक्षा (प्रतिजैविक सुरक्षा कवच) तयार करण्याचे हक्क टाटा समूहाला डावलून दिले गेले आहेत. मात्र, याबाबत टाटा समूहापेक्षा रेस्ट्राटा कंपनीला या कामाचा अनुभव जास्त असल्याची सारवासारव बीसीसीआयने केली आहे.
या कंपनीने जागतिक क्रीडा क्षेत्रात विविध देशांत तसेच स्पर्धांसाठी काम केले असल्याने त्यांनाच आयपीएलसाठीही करारबद्ध करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या कंपनीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि 2012 साली लंडनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ही सेवा पुरवली होती. इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध मालिकेसाठीही याच कंपनीकडून असे सुरक्षा कवच तयार केले होते.
टाटा समूहाला या कामाचा फारसा अनुभव नाही, त्यामुळे रेस्ट्राटा कंपनीचे सादरीकरण पाहिल्यावर त्यांनाच हे काम देण्याचे निश्चित करण्यात आले. या सेवेसाठी टाटा समूहापेक्षाही खूप कमी रकमेत या कंपनीने काम करण्याची तयारी दर्शवली आहे, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.