नवी दिल्ली-: आयपीएल सुरू होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, डब्ल्यूटीसी फायनलमुळे रोहित शर्मा आयपीएलच्या काही सामन्यांमधून बाहेर असू शकतो. अशा परिस्थितीत सूर्यकुमारवर मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
रोहित हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्याने विक्रमी पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. MI च्या 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मधील प्रत्येकी पाच विजय त्यांच्या नेतृत्वाखाली झाले.आयपीएल 2023 च्या फायनलनंतर लगेच अवघ्या 9 दिवसांत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 2023 च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप लंडनमधील ओव्हल येथे खेळवली जाणार असून 7 जूनपासून फायनल ला सुरवात होणार आहे.
WTC फायनलच्या पार्श्वभूमीवर रोहितचा विश्रांती घेण्याचा विचार
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार रोहित शर्मा आयपीएलच्या काही सामन्यांसाठी फायनलच्या पार्श्वभूमीवर विश्रांती घेऊ शकतो. तो स्पर्धेतील काही सामन्यांसाठी बाहेर असू शकतो. रविवारी (2 एप्रिल) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध MI अशी लढत होणार आहे.
सूर्यकुमार यादव असू शकतो कर्णधार
रोहितने आयपीएलदरम्यान विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्यास सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. कायरन पोलार्डच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमारला ही संधी मिळू शकते. या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या T20 फलंदाज सूर्यकुमार यादव याची भारताच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली होती.