नवी दिल्ली -भारतात करोनाचे रुग्ण वाढत असतानाच जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांकीत माफक घट झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, ऍक्सिस बॅंक, इंडसइंड बॅंक या सारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही.
मात्र अशा परिस्थितीतही सन फार्मा, एचयुएल, टेक महिंद्रा, डॉक्टर रेड्डीज, या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. या परिस्थितीचे विश्लेषण करताना रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, वित्तीय कंपन्यांच्या शेअरच्या भावावर दबाव असल्यामुळे निर्देशांकात फार मोठे चढ-उतार पाहायला मिळाले नाहीत.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 154 अंकांनी कमी होऊन 49,591 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 38 अंकांनी कमी होऊन 14,834 अंकांवर बंद झाला.
आशियायी शेअर बाजारातून सकाळी नकारात्मक संदेश आल्यानंतर गुंतवणूकदारांची दिवसभर विक्रीची मानसिकता राहिली. वित्तीय कंपन्याबरोबरच औषधी कंपन्यांनी या आज विक्रीचा मारा सहन केला. रुपया घसरत असल्यामुळे निर्यात करणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
पुढील आठवड्यात माहीती तंत्रज्ञान कंपन्यातील काही कंपन्या आपले चौथ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर करणार आहेत. त्यानंतर शेअर बाजारांना थोडीफार दिशा मिळू शकेल.चौथ्या तिमाहीत भारतीय कंपन्यांच्या नफ्यात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे बऱ्याच विश्लेषकांनी सांगितले आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून काही शहरातील लॉकडाऊनचा विषय चिंतेचा आहे. गेल्या आठवड्यात मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. आगामी काळात या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.