मुंबई – भारताच्या आर्थिक दृष्टिकोनातून अनेक सकारात्मक बाबी या आठवड्यात घडल्या आहेत. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक गेल्या तीन दिवसात मोठ्या प्रमाणात वाढले. यामुळे या तीन दिवसात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल 9 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.
गेल्या तीन दिवसात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 4.16 टक्क्यांनी म्हणजे 2,301 अंकांनी वाढला आहे. यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य 9 लाख कोटी रुपयांनी वाढून 266 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्विसेसचे रिटेल व्यवहार प्रमुख सिद्धार्थ खामेका यांनी यासंदर्भात सांगितले की, जागतिक बाजारातून अनेक कारणामुळे सकारात्मक संदेश येत आहेत. त्याचबरोबर भारतातील कंपन्यांनी पहिल्या तिमाहीचे नफादायक ताळेबंद जाहीर केले आहेत. अमेरिकेत मंदीची शक्यता असल्यामुळे आगामी काळात अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह पुन्हा व्याजदरात वाढ करणार नाही असे समजले जाऊ लागले आहे.
त्यामुळे रुपयाच्या तुलनत डॉलर आणखी वधारण्याची शक्यता मावळत आहे. परिणामी परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करीत असून गेल्या 15 दिवसांमध्ये या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात विक्री करण्याऐवजी खरेदी केली आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारात एकूणच खरेदीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
रशिया युक्रेन युद्धाची परिणामकारकता मंदावल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवरील परिणाम कमी झाला आहे. कच्चे तेल वगळता इतर वस्तूच्या किमती वेगाने कमी होत आहेत. त्यामुळे भारताचा आयातीचा खर्च कमी होणार आहे. रशिया- युक्रेन युद्ध आणि अमेरिकेतील व्याजदर वाढ या कारणामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक गेल्या सहा महिन्यापासून कमी होत होते.
मात्र आता परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे आता निर्देशांक कमी होणार नाहीत असे समजून बरेच गुंतवणूकदार गेल्या पंधरवड्यापासून खरेदी करीत असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक उंचावले आहेत. आगामी काळात त्यात वाढ होण्याची शक्यता अधिक असल्याचे समजले जात आहे.