सध्या मंदीचे सावट असले तरी भारतातील रिअल इस्टेट क्षेत्र या प्रभावापासून बाहेर पडत असल्याचे चिन्हे आहेत. कारण चालू वर्षाच्या जानेवारीपासून ते आतापर्यंत रिअल इस्टेट सेक्टरमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण 9 टक्क्यांनी वाढून 43,780 कोटी रुपयांपर्यंत पोचल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात ग्लोबल प्रॉपर्टी कन्सल्टंट फर्म कोलियर्सने रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकवाढीचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. परिणामी नव्या वर्षात 2020 मध्ये या सेक्टरमध्ये गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.
कोलियर्सच्या अहवालानुसार यावर्षी रिअल इस्टेट सेक्टरमध्ये एकूण गुंतवणुकीच्या 46 टक्के म्हणजेच 19,900 कोटी रुपयांचा वाटा हा केवळ ऑफिस प्रॉपर्टीत राहिला आहे. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक 8.7 टक्क्यांनी वाढून 620 कोटी डॉलर (43,780 कोटी रुपये) झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी घरगुती रिअल इस्टेट सेक्टरमध्ये झालेली गुंतवणूक पाहता एकूण गुंतवणुकीतील त्याचा हिस्सा तब्बल 78 टक्के राहिला आहे. ही गुंतवणुकीची उच्चांकी पातळी मानली जाते.
कोलियर्सच्या अंदाजानुसार 2020 या काळात भारतीय रिअल इस्टेट सेक्टरमध्ये गुंतवणूक वाढून ती 46,170 कोटी रुपयांपर्यंत वाढेल. विशेष म्हणजे यातील बहुतांश गुंतवणूक ही निवासी किंवा गृहप्रकल्पाच्या सेक्टरमध्ये नसेल. यासंदर्भात कोलियर्स इंटरनॅशनल इंडियाचे अध्यक्ष सैकी प्रसाद म्हणतात की, बांधकामस्थितीतील ऑफिस प्रॉपर्टीसह आयटीशी निगडीत मालमत्तेची ग्राहकांनी गुंतवणुकीसाठी निवड करावी. आयटी सेक्टरच्या बाजाराला भविष्यात मोठी मागणी असणार आहे.
विशेष म्हणजे बंगळूर, हैदराबाद आणि पुण्यासारख्या शहरात गुंतवणुकीची मोठी संधी आहे. कन्सल्टंट फर्मच्या अपेक्षेनुसार गुंतवणूकदार आगामी तीन वर्षात कमर्शियल ऑफिस प्रॉपटीवर अधिक लक्ष केंद्रीत करतील. या क्षेत्रात मागणी वाढत असल्याने भाड्यातही वाढ नोंदली जावू शकते. आयटी हब असलेले मुंबई, दिल्लीशिवाय बंगळूर देखील गुंतवणुकदारांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल.
बंगळुरने दिल्लीला मागे टाकले
यावर्षी रिअल इस्टेट सेक्टरमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात बंगळूर यशस्वी ठरले. त्याने दिल्लीला मागे टाकले. त्यामुळे मुंबईनंतर आता बंगळूरचा नंबर लागतो. या काळात बंगळूरमध्ये 4,650 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मुंबई रिअल इस्टेट सेक्टरमध्ये यावर्षी देशातील एकूण गुंतवणूकीपैकी सर्वाधिक 25 टक्के गुंतवणूक झाली आहे.