स्वप्निल श्रोत्री
भारतात ज्ञानाची आणि बुद्धिमत्तेची कमी अजिबात नाही. त्यामुळे भारताचे ज्ञान आणि भारतीय बुद्धिमत्ता ही भारताच्याच कामी येणे आवश्यक आहे.
कोणत्याही राष्ट्राचा विकास हा त्या राष्ट्रातील तरुणांवर अवलंबून असतो. ज्या राष्ट्राच्या विकासात तरुणांचे योगदान अधिक असते त्या राष्ट्राचा विकासदर जास्त असतो, असे सर्वसाधारण समजले जाते. अर्थशास्त्रातील जीडीपी, जीएनपी, पीपीपी अशा किचकट संकल्पना सामान्य जनतेला समजत नसल्या तरी देशाच्या विकासात तरुणांचे योगदान हे सर्वाधिक असून त्यांच्या योगदानाच्या भोवतीच अर्थशास्त्रातील वरील संकल्पना फिरत असतात हे समजण्यासारखे आहे. सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमधील भारतीय तरुणांच्या घरवापसीचा प्रश्न गंभीर झाला होता. दरवर्षी भारतातील लाखो तरुण हे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने परदेशात स्थायिक का होतात? या विषयी समाज माध्यमात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
गेल्या वर्षी जॅक डोर्सी यांनी ट्विटरच्या विशेष कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे ट्विटरचे नवीन विशेष कार्यकारी अधिकारी होणार हे जाहीर झाले होते. त्यावेळी अशाच प्रकारची चर्चा देशात सुरू झाली होती. दुसरीकडे पराग अग्रवाल यांच्या नियुक्तीनंतर देशातील काही तरुणांमध्ये आनंदाचे वातावरणसुद्धा पाहायला मिळाले. दरवर्षी शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने परदेशी जाणारे भारतीय तरुण आणि विविध राष्ट्रांतील बहुराष्ट्रीय कंपन्यांत उच्च पदावरील भारतीय वंशाच्या नागरिकांची नियुक्ती यांच्यावर देशात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असली तरी भारतीय तरुणांचे ब्रेन ड्रेन थांबणार कधी? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
ब्रेन ड्रेन म्हणजे नक्की काय?
सोप्या शब्दांत सांगायचे तर विकसनशील किंवा अविकसित राष्ट्रातील उच्चशिक्षित तरुण किंवा नागरिक परदेशात (अर्थात विकसित राष्ट्रांत) काही वैयक्तिक कारणांसाठी (उदा., शिक्षण, नोकरी किंवा इतर) जातात आणि तेथेच स्थायिक होऊन आपल्या शिक्षणाचा व बुद्धिमत्तेचा वापर स्थायिक झालेल्या राष्ट्राच्या विकासासाठी करतात त्याला “ब्रेन ड्रेन’ असे म्हणतात. ब्रेन ड्रेन करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्याही अधिक असते. त्यामुळे एका ठराविक वयानंतर तरुणांनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणे अपेक्षित असते त्या वेळी हे तरुण परदेशात निघून जातात आणि देशाचे नुकसान होते.
भारतातील ब्रेन ड्रेनची प्रमुख कारणे
1) भारतात आजही जुनाट शिक्षण पद्धतीचा वापर केला जातो. 10-10 वर्षे शैक्षणिक अभ्यासक्रम बदलला जात नाही. त्यामुळे नवीन ज्ञान व तंत्रज्ञान भारतात ज्या वेगाने येणे अपेक्षित आहे त्या वेगाने ते येत नाही. उदा., आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग इत्यादी.
2) भारतातील शिक्षण पद्धती ही आजही परीक्षा केंद्रित आहे. व्यक्तीच्या ज्ञानापेक्षा त्याच्या परीक्षेतील गुणांना जास्त महत्त्व दिले जाते. परिणामी, पालक आणि समाज हा विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता ही परीक्षेतील गुणांवरून मोजतो.
3) ऑक्सफर्ड व केंब्रिज अशा नावाजलेल्या विद्यापीठात भारतीय वंशाचे अनेक प्राध्यापक पाहायला मिळतात. भारतीय विद्यापीठे सोडून प्राध्यापकांनी परदेशात जाण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील सुविधांचा अभाव होय. ज्या दर्जाचा मान-सन्मान, वेतन किंवा मानधन, सुविधा या शिक्षकांना मिळायला हव्यात त्या भारतात दिल्या जात नाहीत.
4) विज्ञान आणि तंत्रज्ञानावर देशाने आपल्या जीडीपीच्या कमीत कमी 2 टक्के खर्च करणे अपेक्षित आहे. परंतु, भारतात हा खर्च 0.75 टक्के इतका आहे तर चीनसारख्या शेजारील राष्ट्रात 2019 मध्ये हा खर्च 16 टक्के इतका करण्यात आला होता.
5) भारतात आयआयटी, आयआयएम सारख्या काही ठराविक शिक्षणसंस्थांना सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो. त्यामुळे आयआयटी, आयआयएमशिवाय इतर शिक्षणसंस्थांकडे निधीची कायम कमी असते. याचा नकारात्मक परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतो.
6) भारतात शिक्षणाला अनुसरून चांगली नोकरी मिळणे हे आव्हानात्मक आहे तर परदेशात शिक्षण आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असतात; त्यामुळे चांगल्या रोजगाराच्या शोधात अनेक भारतीय तरुण हे परदेशाची वाट धरतात.
7) भारतात चांगला रोजगार मिळणे जितके अवघड आहे तितकाच अवघड व्यवसाय करणेसुद्धा आहे. भारतात आजही “लायसन्स राज’ आहे. छोट्या व्यवसायासाठीसुद्धा डझनभर लायसन्स काढावे लागतात. खालपासून वरपर्यंत लाच दिल्याशिवाय सरकारी कामे होत नाहीत. परिणामी, भारतात उद्योगधंदे उभे करण्यापेक्षा लोक परदेशात उद्योग उभारण्यास पसंती देतात.
भारतीय समाजात आणि प्रशासनात अनेक त्रुटी आहे हे खरे आहे. परंतु, अशा त्रुटी अमेरिका, फ्रान्स, जपान, ब्रिटन, जर्मनी अशा विकसित देशात नाहीत काय? प्रत्येक देशात आपणास या त्रुटी पाहावयास मिळतील फक्त काही देशात त्या जास्त तर काही देशात कमी प्रमाणात आहेत. ब्रिटिशांनी जेव्हा भारत सोडला तर भारतीयांच्या अंगावर घालायला कपडे आणि पोटात अन्न नव्हते. आज ती परिस्थिती नाही. तेव्हाच्या भारताच्या गरजा या वेगळ्या होत्या, आजच्या भारताच्या गरजा वेगळ्या आहेत. कोणतेही राष्ट्र हे समाजातून घडतं असते; त्यामुळे समाज कसा आहे यावर राष्ट्राचा विकास अवलंबून असतो. पराग अग्रवाल यांच्यासारखी उदाहरणे भारतात आहेत तशीच अशीही अनेक उदाहरणे आहेत जेथे भारतीय लोक परदेशात जाऊन तेथून विज्ञान व तंत्रज्ञान भारतात घेऊन आले आणि यशस्वी झाले आहेत.
नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर, फ्लिपकार्टचे सचिन आणि बिन्नी बन्सल अशी उदाहरणे देता येतील; त्यामुळे आपण पराग अग्रवाल किंवा सुंदर पिचाई यांच्याकडे बघून खूश व्हायचे की फाल्गुनी नायर यांच्याकडे बघून खूश व्हायचे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.
भारत हे विकसनशील राष्ट्र आहे. त्यामुळे राष्ट्राचा विकास करण्यासाठी भारताला बुद्धिमान तरुणांची सर्वात जास्त गरज आहे. भारतात ज्ञानाची आणि बुद्धिमत्तेची कमी अजिबात नाही; त्यामुळे भारताचे ज्ञान आणि भारतीय बुद्धिमत्ता ही भारताच्याच कामी येणे आवश्यक आहे. केवळ स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी परदेशात बसून राष्ट्रभक्तीच्या पोस्ट लिहिण्यापेक्षा भारतात राहून भारताच्या विकासासाठी योगदान देणे यात खरी राष्ट्रभक्ती आहे.