– डॉ. रिता शेटीया
सध्या नागपुरात भीषण पूरस्थिती उद्भवली आहे. “नागपूरमध्ये हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढत आहे. त्यामुळे नागपुरात भयंकर पूरस्थिती निर्माण होऊ शकते’, असा इशारा एका संस्थेने दिला होता, तो खरा ठरला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने 16 सप्टेंबर 1987 रोजी क्लोरोफ्युरो कार्बनची निर्मिती आणि वापर यावर नियंत्रण ठेवण्याचा करार केला. त्यानिमित्ताने 16 सप्टेंबर हा दिवस “जागतिक ओझोन संरक्षण दिवस” म्हणून जगभर साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून जागतिक तापमान वाढ हा मुद्दा सातत्याने जागतिक व्यासपीठावर चर्चेत आहे. परंतु संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीस यांनी म्हटल्याप्रमाणे, आता उत्कलनाचा काळ सुरू झाला आहे. औद्योगिक काळाच्या आधीपेक्षा जगाचे तापमान सरासरी 1.2 टक्क्यांनी वाढलेले आहे. उत्तर गोलार्धात झालेली टोकाची तापमान वाढ, एल निनोसारखे समुद्री प्रवाह, दक्षिण गोलार्धातील उष्ण पाणी, 2022 मध्ये फुटलेला प्रशांत महासागरातील सागा टोंगा ज्वालामुखी, यामुळे अतिशय शक्तिशाली/विघातक असे ग्रीन हाउस गॅसेस निर्माण झाले.
वातावरणातील मिथेनची वाढलेली पातळी, त्याचबरोबर घातक वायूंच्या उत्सर्जनामुळे ओझोन थर विरळ होत आहे. जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न बऱ्याच संस्था करत आहेत. अजून यावर ठोस असे उपाय करता आलेले नाही. डिसेंबर 2022 मध्ये 122 वर्षांतला सर्वात जास्त तापमान असलेला महिना आपण अनुभवला. नंतर फेब्रुवारी 2023 मध्ये 1901 नंतरचा सर्वाधिक तापमान असलेला महिना संपूर्ण जगाने अनुभवला. जागतिकीकरणाच्या या युगात एकीकडे वाढते औद्योगीकरण, शहरीकरण, वाढता ऊर्जेचा वापर, जंगलतोड, वृक्षतोड, बदललेले राहणीमान, ग्रीन हाउसचा परिणाम ही वातावरण प्रदूषणाची महत्त्वाची कारणे आहेत. विविध उद्योगांमध्ये क्लोरोफ्युरो कार्बन्स, हेलॉन्स, मिथिल क्लोरोफॉर्म, मिथिल ब्रोमाई, हायड्रो क्लोरोफ्युरो कार्बन्स यांसारख्या वायूंचा वापर केला जातो.
पृथ्वीभोवती असलेले नैसर्गिक ओझोनचे कवच जे सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून संरक्षण करते ते या घातक वायूंच्या उत्सर्जनामुळे कमकुवत होत आहे. अतिनील किरणे मानवी जीवन, वनस्पती आणि प्राण्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने घातक आहेत. या किरणांमुळे जागतिक तापमानात बदल होत आहे. बदलत्या हवामानामुळे विविध देशांतील पावसाचे तसेच उन्हाळ्याचे चित्र बदलले आहे. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे आज आपल्याला या परिस्थितीशी जुळून घेणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
मानव अथवा निसर्गनिर्मित वातावरणातील बदल दिसायला लागलेत फक्त मानवी जीवनावरील परिणाम दिसणे बाकी आहे. प्रत्येक राष्ट्र आर्थिक विकास, आर्थिक महासत्ता बनण्याच्या चढाओढीत लागला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर ज्या जागतिक समस्या आहेत त्या समस्यांकडे पाहिजे तितके लक्ष दिले जात नाही. जागतिक स्तरावरील जी20, ब्रिक्स अशा बऱ्याच संस्था पर्यावरण बदलावर काम करत आहेत. भारतात उष्णतेशी सामना करण्यासाठी 2016 मध्ये नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍथॉरिटीने त्यासाठी मार्गदर्शक सूत्रे आखून दिली आहेत. 2013 मध्ये अशा उपाययोजना करणारे अहमदाबाद हे आशिया खंडातील पहिले शहर ठरले.
पण केवळ सरकार आणि संस्थांची ही जबाबदारी नसून प्रत्येक व्यक्तीने ठरवले तर जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण आणता येऊ शकते. वेळीच जर योग्य पावले उचलली गेली नाहीत तर जागतिक तापमान वाढीचे परिणाम भयानक असतील, हे संशोधक सांगत आहेत. मात्र त्यावर “मी एकट्याने हे करून काय होणार?’ असा विचार केला जातो. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. असे वाटते की, स्टीफन हॉकिंग यांनी दिलेला इशारा प्रत्यक्षात उतरण्याचे दिवस जवळ आले आहेत, असे दिसते. पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत हा निसर्गात केलेल्या मानवाच्या हस्तक्षेपामुळे आणि त्यामुळे वातावरणात झालेले अनिष्ट बदल यामुळे होईल. असे त्यांनी भाकीत केले होते. ज्यातील जगातील स्तरावर सर्वच देशांनी महापूर, दुष्काळ आणि महामारीचा अनुभव घेतला आहे. ही सुरुवात असली तरी मानवी जीवनावरील विघातक परिणाम सुरू होण्यास वेळ लागणार नाही.
हवेचे प्रदूषण तर आणखी घातक आहे. मानवाच्या ऊर्जा वापरामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खते, किटकनाशके, कृमीनाशके यांचा वापरही हवेचे प्रदूषण वाढवते. सर्वात महत्त्वाचे कोळसा आणि इंधन तेलाच्या वापरामुळे वातावरणात सोडले जाणारे कर्बवायू तापमान वाढीचे कारण बनतात. त्याचा परिणाम निसर्गचक्रावर होतो. पावसाचे अवेळी येणे. मुसळधार पाऊस पडणे. अचानक वादळ, पूरपरिस्थिती उद्भवणे हे वारंवार जग अनुभवत आहे. अनेक उद्योग, कारखाने, व्यवसाय पाण्याचा बेसुमार वापर करतात. वापरलेल्या पाण्यामध्ये धूळ, रसायने, जैविक घटक मिसळतात.
असे वापरलेले पाणी प्रक्रिया करून पुढे सोडायला हवे. मात्र अनेक उद्योग कोणतीही प्रक्रिया न करता ते पाणी बाहेर सोडतात. ते पाणी जमिनीत मुरते, पाणी हळूहळू जमिनीतील कोणतेही जैविक घटक नसलेल्या पाण्यामध्ये मिसळतात. परिणामी जमिनीतील पाण्याचे साठे प्रदूषित होतात. असे जमिनीतील प्रदूषित पाणी वापरणाऱ्या त्या भागातील लोकांना काही दिवसांनंतर याचा त्रास सुरू होतो. याचा विचार उद्योगातून बेसूमार नफा मिळवणारे उद्योजक करत नाहीत. कोकण किनारपट्टीवर बेसुमार पाण्याच्या उपशामुळे समुद्रातील पाणी विहिरीमध्ये मिसळून विहिरीतील पाणी खारट बनत आहे. एकूणच पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसून येते.
भारतातील इंटरनॅशनल काउंसिल फॉर लोकल एन्व्हायरमेंट इनिशिएटिव्हज संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली की उपराजधानी नागपूरमध्ये हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढत आहे. नागपूरमध्ये दरवर्षी 3.03 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइडमुळे नागपूरमध्ये प्रचंड तापमान वाढ होईल. त्यामुळे कधीही मुसळधार पाऊस पडण्याची आणि पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. आता नागपूरमध्ये जी पूरस्थिती निर्माण झाली आहे, यामागे वरील कारण कारणीभूत आहे. या अहवालानुसार भारतातील स्मार्ट शहरांपैकी 15 शहरे अशा मोठ्या पर्यावरणीय समस्यांच्या जाळ्यात येणार आहेत.
रसायन, सिमेंट, विद्युत उपकरणांचे कारखाने, कापड, सिरॅमिक्स उद्योग, औषध निर्मिती, अन्नप्रक्रिया, लाकूड आणि कागद उद्योग असणाऱ्या शहराच्या परिसरात तापमान वाढ करणारे हरितगृह वायू मोठ्या प्रमाणात सोडले जातात. या शहरांनी असे वायू वातावरणात सोडण्याच्या कारणांवर नियंत्रण आणणे आणि हे प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा जास्त घटवणे आवश्यक आहे. यासाठी याच अहवालामध्ये काही उपाय सूचविण्यात आले आहेत. यातील महत्त्वाचा उपाय म्हणजे शहरांमध्ये विद्युत वाहनांचा वापर करायला हवा. ई-वाहतूक, शक्य त्या सर्व ठिकाणी सायकलचा वापर करायला हवा. कचऱ्यापासून शास्त्रशुद्ध पद्धतीने खत निर्मिती प्रकल्प उभारायला हवेत. कचऱ्यातून हरितगृह वायू बाहेर पडणे पूर्णत: थांबायला हवे. कचराभूमी पूर्णत: बंद करायला हव्यात. पर्यावरणपूरक इमारतींच्या बांधकामास प्रोत्साहन द्यायला हवे.
यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो, ई-वाहतूक वाढवणे. ई-वाहतुकीसाठी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढवणे आवश्यक आहे, असे हा अहवाल सांगतो. मात्र या वाहनांच्या बॅटरीज पुनर्प्रभारीत करण्यासाठी वापरली जाणारी ऊर्जा ही कोणत्या ना कोणत्या औष्णिक विद्युत केंद्रात तयार होते. ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या कोळशातून हरितगृह वायू वातावरणात सोडला जातो. त्यातून निर्माण होणारी ऊर्जा प्रदूषणमुक्त ऊर्जा कशी देणार? हा प्रश्न निरूत्तरित राहतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने ऊर्जेऐवजी जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करून ऊर्जा निर्मिती व्हायला हवी. यामध्ये पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यांचा अधिकाधिक वापर झाल्यास ई-वाहतुकीस अर्थ प्राप्त होईल. यासाठी गरज आहे ती, जनजागृतीच्या माध्यमातून ओझोन थराचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहचवणे. येत्या काळात देखील पृथ्वीच्या शाश्वत विकासासाठी सर्व देश एकत्र येतील, अशी आशा वाटते.