– हेमंत देसाई
“नवीन संसदेची प्रतिष्ठा जपा’, असे पंतप्रधानांनी आवाहन केले. मात्र भाजपच्याच एका खासदाराने संसदेत आक्षेपार्ह शेरेबाजी करत या आवाहनाला तडा दिला.
“सबका साथ सबका विकास और सबका विश्वास’, अशी सुधारित घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019च्या निवडणुकीतील विजयानंतर दिली होती. पसमांदा मुस्लिमांची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. मुस्लीम मुली व महिलांकडून रक्षाबंधन करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले होते. नवीन संसद भवनात संसदेच्या विशेष सत्रात भाषण करताना मोदी यांनी सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याची विनंती सर्व सदस्यांना उद्देशून केली. परंतु राज्यकर्त्यांच्या उक्ती आणि कृतीत नेहमीच फरक पडत असतो.
लोकसभेत बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांना उद्देशून भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी जी आक्षेपार्ह शेरेबाजी केली, त्यावरून हेच दिसून येते.
गुरुवारी चांद्रयान 3च्या यशासंदर्भातील चर्चेमध्ये बिधुरी यांनी दानिश यांच्यावर, त्यांच्या मुस्लीम धर्मावरून अवमानास्पद शेरेबाजी केली. त्यांच्यावर अतिरेकी व दहशतवादी असल्याचा आरोप केला. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या भाषणादरम्यान माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद हे हास्यविनोदात रमले होते आणि अधूनमधून हर्षवर्धन हे बिधुरी यांच्या भाषणास हसून दादही देताना दिसले. अनेकदा अंगाशी आले की भाजपचे नेते हात वर करतात आणि जबाबदारीतून मोकळे होतात. तेच हर्षवर्धन यांच्याबाबत घडले. लोकसभेत शाब्दिक कोट्या सुरू होत्या. त्या घटनेचा मी साक्षीदार होतो. पण सभागृहातील गदारोळामुळे नेमके काय बोलले जात आहे, हे मला स्पष्ट ऐकू आले नाही, असा खुलासा हर्षवर्धन यांनी केला आहे. तो मुळीच पटण्यासारखा नाही.
हर्षवर्धन हे हिंदू-मुस्लीम सलोख्याबद्दल अनेकदा प्रवचने ऐकवत असतात. तर रविशंकर हे आक्रस्ताळेपणे बेफाम बोलण्याबद्दल प्रसिद्धच आहेत. एरवी राहुल गांधींबाबत अश्लाघ्य टीका करण्यात सदैव तत्पर असणारे रविशंकर आता मात्र मूग गिळून बसले आहेत. बिधुरी यांच्या वर्तनाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यंनी खेद व्यक्त केला आहे. तर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांना नोटीस बजावली असून, दोन आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे.
वास्तविक बिधुरी यांना तात्काळ पक्षातून हाकलले पाहिजे. तर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी बिधुरींची विधाने इतिवृत्तातून काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. वर्तनात सुधारणा न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. खरे तर, ही बिधुरींना मिळालेली सूटच आहे. राहुल गांधी यांचे सदस्यत्व तत्परतेने रद्द करण्यात आले होते. संसदेत गैरवर्तन केल्याबद्दल डेरेक ओब्रायन व संजय सिंग यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु भाजपच्या सदस्यास मात्र वेगळा न्याय दिला जात आहे.
दानिश अली यांनी लोकसभाध्यक्षांना पत्र लिहून बिधुरी यांच्या विरोधात तक्रार केली असून, हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवावे, अशी मागणीही केली आहे. संसदेच्या नियमानुसार, विशेषाधिकार समिती अशी कारवाई करू शकते आणि तिने ती अवश्य करावी. एरवी पत्रकार वा संसदबाहरच्या व्यक्तीने जरा काही कठोर मत व्यक्त केले, की लगेच त्याची तातडीने दखल घेतली जात असते. मग हाच न्याय बिधुरी यांच्यासारख्या खासदारांना का लागू होऊ नये?
बिधुरी यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांना अटक करावी, अशी मागणी “इंडिया’ आघाडीने केली आहे. सभागृहात सदस्यांना विशेष संरक्षण मिळते. परंतु म्हणून तेथे वाट्टेल ते बोलण्याचा वा स्वैराचार करण्याचा अधिकार त्यांना बहाल करण्यात आलेला नाही. मात्र बिधुरी यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, तशाच भावना अन्य काही सदस्यांच्याही असू शकतात. फक्त काहीजण बोलतात आणि काहीजण बोलत नाहीत, एवढाच फरक. परधर्माबद्दल पराकोटीचा द्वेष करणे, हे विशिष्ट विचारसरणी बाळगलेल्या लोकांच्या नसानसांत भिनले आहे.
यापूर्वी प्रेषित महम्मद पैगंबरासंदर्भात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल हे भाजपचे दोन नेते चर्चेत आले होते. वास्तविक त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाण्याची आवश्यकता होती. परंतु ते तर घडवले नाहीच उलट भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी, या दोघांना आता माफ करायला हवे, अशी मागणी केली होती. इस्लाम माफ करण्याबाबत शिकवण देतो, असा युक्तिवादही करण्यात आला. त्यापूर्वी बहुजन समाज पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करून मंत्री बनलेले केशवप्रसाद मौर्य यांनी, 2017 साली मुस्लीम समाजातील विवाहाबाबत आक्षेपार्ह उद्गार काढले होते.
त्याचबरोबर बिहार भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर बचौल यांनीही मुस्लीम समाजाबाबत आक्षेपार्ह उद्गार काढले होते. त्यापूर्वी त्यांनीच मुस्लिमांचा मताधिकार काढून घेण्याची मागणी गतवर्षी केली होती. दोन वर्षांपूर्वी हरिद्वारच्या धर्मसंसदेत मुस्लीमविरोधी घोषणा भाजप नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील अश्विनी उपाध्याय यांनी दिल्या होत्या. मुळात मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनीही मुस्लिमांबद्दल विखारी वक्तव्ये केली आहेत. पक्षाचे नेतृत्वच जर याप्रकारे वागत असेल, तर बिधुरी यांच्यासारख्यांनी असे वागणे, यात धक्कादायक असे काहीच नाही. या निमित्ताने पक्षाचा खरा चेहरा बाहेर आला आहे, एवढेच. काही दिवसांनी बिधुरी यांचे प्रकरण विस्मृतीत जाईल. बाकी काही होणार नाही!