नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उद्या (रविवार) देशभरातील 59 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. अनेक बडे चेहरे रिंगणात असल्याने त्या टप्प्याबाबत मोठी उत्सुकता आहे.
सहाव्या टप्प्यात उत्तरप्रदेश (14 जागा), हरियाणा (10 जागा), झारखंड (4 जागा) बरोबरच बिहार, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8 जागांसाठी मतदान होईल. त्याशिवाय, दिल्लीतील लोकसभेच्या सर्व 7 जागा निवडून देण्यासाठी मतदार त्यांचा हक्क बजावतील. या टप्प्यात 10 कोटींहून अधिक मतदार त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी पात्र आहेत. लोकसभेच्या 59 जागांसाठी एकूण 979 उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत.
त्या उमेदवारांमध्ये राधामोहन सिंह, हर्ष वर्धन आणि मनेका गांधी या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्याशिवाय, उमेदवार म्हणून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
इतर प्रमुख उमेदवारांमध्ये माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि कुमारी सेलजा यांच्याबरोबरच माजी क्रिकेटपटूू गौतम गंभीर आणि चॅम्पियन बॉक्सर विजेंदर सिंह यांचा समावेश आहे. या टप्प्यात मध्य प्रदेशच्या भोपाळमधील लढत सर्वांत चर्चेचा विषय ठरली आहे. तिथून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह तर भाजपच्या उमेदवार म्हणून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.