Rohit Pawar : मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद पेटल्याचे चित्र दिसत आहे. बीड, परभणी या भागात आंदोलनला 30 ऑक्टोबर रोजी हिंसक वळण लागले. काही नेत्यांची घरं, कार्यालये यांना आग लावण्यात आली. अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे. आजही काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला आहे. राज्यात सध्या चिंताजनक परिस्थती असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे छत्तीसगडमधील रायपूरच्या भाजप कार्यालयात बैठक घेत आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांनी ट्वीट (एक्स) करत लिहीले की, “आज सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र होरपळतोय… पण ही आग विझवण्याचं सोडून आपले गृहमंत्री छत्तीसगड भाजप राजकीय आगीत खाक होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून तिकडं जातात… कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, हे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासारख्या नेत्याला नक्कीच कळत असणार.. तरीही महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात?”
“एकीकडे मनोज जरांगे पाटील शांततेचं आवाहन करत आहेत. पण गृहमंत्री असूनही महाराष्ट्र जळत असताना तुम्ही इतर राज्यात निघून जाता. याचा अर्थ या जाळपोळीच्या घटनांची तुम्ही अप्रत्यक्षरीत्या पाठराखण करता, असं आम्ही समजायचं का?” असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. यावेळी त्यांनी काही स्क्रिनशॉट देखील शेअर केले आहेत.
आज सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र होरपळतोय… पण ही आग विझवण्याचं सोडून आपले गृहमंत्री छत्तीसगड भाजप राजकीय आगीत खाक होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून तिकडं जातात…
कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, हे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासारख्या नेत्याला… pic.twitter.com/m6QM1O3ugE
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 31, 2023
दरम्यान, नुकतेच मनोज जरांगे यांनी जालन्यातील आंदोलनस्थळावर आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत फोनवरून केलेल्या चर्चेविषयीची माहिती दिली. अर्धा तास झालेल्या चर्चेत कुणब प्रमाणपत्र, विशेष अधिवेशन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जरांगे म्हणाले की, “नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही.आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा 2004 चा GR दुरुस्त करा” असे मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे म्हटले.
“विशेष अधिवेशन घ्या”
पुढे जरांगे म्हणाले की, “शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 60 -65 टक्के मराठा समाज अगोदरच obc मध्ये आहे, आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या. ज्याचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत. मराठवड्यात कागदपत्रे जमा करा आणि सर्व महाराष्ट्राला आरक्षण द्या. विशेष अधिवेशन घ्या, समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून तिला राज्याचा दर्जा द्या,” अशीही मागणी जरांगे यांनी यावेळी केली.