नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले आहेत. ही घटना 9 डिसेंबरच्या रात्री घडली. ही चकमक झाल्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक माघारी परतले. मात्र, भारतीय लष्कराकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील याग्त्से येथे 9 डिसेंबर 2022 रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हाणामारी झाली. या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. या चकमकीत जखमी झालेल्या 6 जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही चकमक चिनी सैन्य यग्त्से भागात आल्यानंतर झाली. ते यग्त्से भागात आल्यानंतर भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत त्यांना पळवून लावले. यादरम्यान दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मीटिंग झाली आणि हे प्रकरण मिटवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी जूनमध्ये मध्यरात्री उभय देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या मारामारीत जीवितहानी झाली होती. गलवान खोऱ्यातील हा संघर्ष भारत आणि चीन यांच्यातील चार दशकांतील सर्वात प्राणघातक संघर्ष होता.