मुंबई – राज्यात काही दिवसांमध्ये 11 ते 20 वयोगटातील मुलांना करोना होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे त्यांचे लसीकरण व्हावे यासाठी राज्य सरकार केंद्राकडे आग्रह धरत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, 30 नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात राज्यातील कोविड टास्क फोर्सचे देखील मुलांच्या लसीकरण करण्यात यावे असे मत आहे. या मुलांपासून करोनाचा प्रादुर्भाव प्रसार रोखण्यासाठी हे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
राजेश टोपे म्हणाले, जगभरामध्ये आता 11 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु आहे. आपल्याकडे या वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु नाही. पण या वयोगटातील मुलांना जर करोनाची लागण झाल्यास त्याचा प्रसार हा वृद्ध वयोगटातील व्यक्तींना होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी राज्याने केंद्राकडे आग्रह धरला आहे.
तसेच राज्यात रोज जवळपास पाच लाख लोकांचे लसीकरण होत आहे. या नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत किंवा त्या पुढच्या दहा दिवसांमध्ये राज्यातील 100 लोकांना लसीचा पहिला डोस मिळेल याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
लसीकरणानंतरच शाळा सुरु कराव्यात
राज्यात अजून लहान मुलांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आधी लहान मुलांचे लसीकरण सुरु करावे आणि मगच शाळा सुरु कराव्यात, असा आग्रह आहे. अनेक महिने लहान मुले शाळेत गेलेली नाहीत. त्यामुळे पेडियाट्रिक लसीकरण लवकरात लवकर सुरु करुन मगच शाळा सुरु कराव्यात, असा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे.