नवी दिल्ली – करोना प्रसाराच्या भीतीने लोकांनी मार्केटमध्ये गर्दी करू नये असे वारंवार आवाहन करूनही लोक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दिल्ली सरकारने आता भाजी खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांचे आपोआपच निर्जंतुकीकरण होईल अशी उपाययोजना करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
त्यांनी आझादपूर मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना एका बोगद्यातून जाणे बंधनकारक करण्यात आले असून त्याच बोगद्यात नागरिकांवर जंतुनाशकांची फवारणी केली जात आहे. हायड्रोक्लोराईट सोल्युशनद्वारे ही जंतुनाशक फवारणी केली जात आहे, अशी माहिती दिल्ली सरकारचे ज्येष्ठ मंत्री गोपाल राय यांनी दिलीे आहे.
दिल्लीतील सर्वच मार्केटमध्ये प्रवेश करणाऱ्यांसाठी लवकरच अशी व्यवस्था केली जात आहे असे त्यांनी सांगितले. दिल्लीतील आझादपूर हे सर्वात मोठे मार्केट असल्याने तेथे सर्वात आधी ही सोय करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.