पुसेसावळी – पुसेसावळी दंगलप्रकरणाच्या तपासात निष्पाप लोकांना त्रास होणार नाही. गावात सर्व जातीधर्माचे लोक राहत असून, सर्वांनी एकोपा ठेवावा. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता, दोषी असलेल्यांवर योग्य कारवाई केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुसेसावळी, ता. खटाव येथील दंगलीत मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची सोमवारी भेट घेऊन, ना. अजित पवार यांनी त्यांचे सांत्वन केले. या दंगलीतील जखमींची विचारपूस करून, त्यांनी गावातील प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, नंदकुमार मोरे, सुरेंद्र गुदगे, प्रदीप विधाते, सरपंच सौ. सुरेखा माळवे, सुरेशबापू पाटील, दत्तात्रय रुद्रुके, वरिष्ठ शासकीय अधिकारी, आणि दोन्ही समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, दोषींवर कायद्याप्रमाणे कारवाई होईल. जातीय सलोखा ठेवण्यासाठी आणि गावातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी सर्वांनी एकमेकांना आधार द्यावा. दंगलीसारखी घटना कोणालाही परवडणारी नाही.
त्यामुळे सर्वांनी न घाबरता एकमेकांना मदत करावी.