राजगुरूनगर – खेड तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील आणि महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी सभोवताली घडणाऱ्या घटनांची पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे यांनी केले.
नागरिकत्व कायदा, कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम, तालुक्यातील वाडा, डेहणे, राजगुरूनगर येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनींची सुरक्षा, याबरोबरच गावातील कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी खेड पोलीस ठाण्यात तालुक्यातील पोलीस पाटील व दक्षता समितीच्या सदस्यांची बैठक मंगळवारी (दि. 24) झाली, त्यावेळी टोम्पे बोलत होते. यावेळी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक निलेश बडाख, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अशोक चौधरी, कार्याध्यक्ष निलेश दौंडकर, उपाध्यक्ष आत्माराम डुंबरे, संदीप भागडे, पपू राक्षे, रंजना पिचड, महिला दक्षता समितीच्या विजया शिंदे, ऍड. मनीषा पवळे, दीप्ती कुलकर्णी, स्वाती आचार्य यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस पाटील, महिला दक्षता समितीच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.
गजानन टोम्पे म्हणाले की, वाडा, डेहणे परिसरात असलेल्या महाविद्यालयातील मुली, महिलांना सुरक्षा देण्यासाठी दक्षता समिती व पोलीस पाटील यांनी पुढाकार घेतला पाहिजे टवाळखोर, छेडछाड करणाऱ्याची माहिती पोलिसांना तात्काळ दिली पाहिजे. 31 डिसेंबर (इयर एन्डिंग) व 1 जानेवारी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन याबाबत जागरूकता बाळगून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस पाटलांनी काम करावे.
याबाबत काही घटना आपापल्या परिसरात घडत असतील तर पोलिसांना कळवावे. शहरातील महिलांवर होणारे अन्याय अत्याचार महिलांचे दागिने चोऱ्या आदी समस्या सोडविण्यासाठी महिला दक्षता समितीच्या महिलांनी पोलिसांची मदत घ्यावी. घरफोडी सारख्या घटना घडत असून त्यावर पोलीस पाटील यांनी गावातील ग्रासमथांच्या मदतीने नजर ठेवावी. ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून गावातील बारीक सारीक घटनांवर लक्ष ठेवून पोलिसांना खबर करावी. आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैधधंदे याबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.