नवी दिल्ली – महागाई आणि इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी आज लोकसभेत चांगलाच गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक सुरू होताच कॉंग्रेस, द्रमुक, तृणमूल कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी महागाई, विशेषत: इंधन दरवाढीवरून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सभापतींच्या आसनापुढील जागेत प्रवेश केला.
टीआरएस सदस्यांनी केंद्राने राज्यांकडून धान खरेदी त्वरीत सुरू करावी अशी मागणी करणारे फलक फडकावले आणि त्या पक्षाच्या सदस्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही विरोधकांच्या आंदोलनात सहभाग घेतला. प्रारंभी, सभापती ओम बिर्ला यांनी निदर्शनाकडे दुर्लक्ष करून सभागृहाचे कामकाज सुरू ठेवले.मात्र, विरोधकांचा हंगामा सुरूच राहिल्याने सभापतींनी सुमारे 25 मिनिटांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब केले.