नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या आदल्या दिवशी आज भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीत भाजप खासदारांनी 7 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सामाजिक न्याय पंधरवड्यात सेवा कार्यासाठी झोकून द्यावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
संसदीय बैठकीत बोलताना मोदींनी समाजातील विविध घटकांच्या हितासाठी सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. आणि त्यांचे तपशील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन खासदारांना केले. उद्या पक्षाच्या स्थापना दिनानिमीत्त होणाऱ्या कार्यक्रमात मोदी भाजप सदस्यांना संबोधित करणार आहेत. भारतीय जनता पक्षाने ईशान्येकडील राज्यांमध्ये चांगले अस्तित्व निर्माण केले आहे हा मुद्दाही मोदींनी यावेळी उपस्थित केला. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नमूद केले की, पक्षाने प्रथमच राज्यसभेत 100 खासदार असण्याचा पराक्रम केला आहे.
यावेळी खासदारांना पक्षाचे नाव किंवा चिन्ह असलेली केशरी टोपी देखील देण्यात आली होती. प्रथमच अशा टोप्या परिधान करून भाजपचे खासदार बैठकीला उपस्थित होते. पक्षाचे खासदार आणि इतर सदस्य 7 एप्रिल रोजी आरोग्य विमा कार्यक्रम ‘आयुष्मान भारत’ आणि ‘जन औषधी केंद्र’, जेथे सवलतीच्या दरात औषधे विकली जातात, या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीवर प्रकाश टाकणार आहेत.
गरिबांसाठी घरे बांधणे आणि त्यांना पाइपलाइनद्वारे घरात पाणी पुरवण्याच्या योजनांच्या प्रचारावरही भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. समाजसुधारक ज्योतिराव फुले आणि बीआर आंबेडकर यांची जयंती पक्षातर्फे मोठ्या दिमाखात साजरी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.