कराड -करोना महामारीच्या काळात नागरिकांची उपासमार होऊ नये, म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तीन महिन्याचे अन्नधान्य रेशन दुकानांमध्ये मोफत देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, कराड तालुक्यात रेशन दुकानला येणारे धान्य अत्यंत निकृष्ठ दर्जाचे, खराब, माती व कचरा मिश्रीत येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
करोना संकटामुळे लॉकडाऊन झालेल्या जनतेला महाविकास आघाडी सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य रेशन दुकानांमध्ये मोफत उपलब्ध करुन दिले आहे. करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाऊन, संचारबंदी आणि आताचा सुक्ष्म कंटेनमेंट झोन अशा विविध आयुधांचा वापर करून करोनाचा संसर्ग रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुलभ व पारदर्शक पध्दतीने रेशन दुकानांमध्ये अन्नधान्य मिळण्यासाठी योग्य नियोजन केले आहे. सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी, मास्क, सॅनिटायझर आदी सर्व बाबींचा वापर करून रेशन दुकानदारांनी सर्व नागरिकांपर्यंत धान्य पुरवठा करण्याची सक्त सूचना केली आहे. शिवाय या कोणी चुकीच्या पध्दतीने काम केल्यास त्यांच्या दुकानचा परवाना रद्द केला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, चोराला शेकडो पळवाटा, या उक्तीप्रमाणे गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवण्याचा प्रयत्न अशा काही रेशन दुकानदार तालुका पुरवठा विभागाच्या वरदहस्ताने करत आहेत. केसरी (एपीएल), अंत्योदय (बीपीएल) कार्डधारकांना धान्य वाटप केले जात आहे. परंतु, हे धान्य कमालीचे खराब असून त्यात प्रचंड घाण आहे. त्यामुळे मोफत धान्य देतायं तर किमान ते चांगलेच धान्य द्या, अशी मागणी नागरिकातून होत आहे.