हैदराबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सध्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यात दोन्ही संघ मालिका विजयाच्या उद्देशाने मैदानात खेळताना दिसतील. मागील सामन्यात भारतीय संघाने विजयाची लय मिळवली असल्याने या सामन्यात भारताला वरचड मानले जात आहे. मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ देखील त्याच ताकदीने भारतीय संघाला टक्कर देण्यास तयार असेल ही नक्की आहे.
या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या संघाने यजमान संघाला चांगलेच आभाळ दाखवले होते. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने पाहुण्यांना तब्बल 208 धावांचे बलाढ्य लक्ष्य दिले होते. मात्र यानंतर भारताच्या गचाळ गोलंदाजी आणि रेंगाळलेल्या क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून भारतावर दिमाखदार विजय मिळवला होता. यानंतर 23 सप्टेंबरला नागपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने मागील पराभवाचा वचपा काढत विंजय मिळवला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे पंचांच्या सल्ल्याने प्रत्येकी 8 षटकांचा सामना खेळवण्यात आला होता. सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आणि सामना जिंकला होता.
हवामान आणि खेळपट्टी काय सांगते ?
हवामान कशे राहील? याबाबत सांगायचे झाल्यास सामन्यातील नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या ठिकाणी संध्याकाळचे तापमान 24-25 अंशाच्या आसपास राहील. अशा वेळी आर्द्रतेचे प्रमाण जास्त राहिल्यास गोलंदाजांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सामान्यादरम्यान पावसाची शक्यता 15 टक्क्यांपर्यंत आहे.
हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मागील 3 वर्षांपासून एकही टी-20 सामना खेळला गेलेला नाही. त्याचबरोबर 2019 पासून आयपीएल स्पर्धेचे सामने देखील या मैदानावर आयोजित करण्यात आलेले नाहीत. या मैदानावर शेवटचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये झाला होता. तेव्हा खेळपट्टीने फलंदाजांना भरपूर साथ दिली होती. त्याच सामन्यात विराट कोहलीने 94 धावांची मॅच-विनिंग खेळी खेळली होती. त्यामुळे या मैदानावर गोलंदाजांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.