मुंबई – विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपा-शिवसेना युती तुटू नये असे आपले मत होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे गटाने बंडखोरी का केली याबाबत त्यांनी एका माध्यमाशी बोलताना याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीत आमची युती होती. विधानसभेच्या वेळी काही जागांच्या वाटपावरून युती तुटली. ती कायम राहावी या मताचा मी होतो. पण दुर्दैवाने युती होऊ शकली नाही.
शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढले. पण नंतर दोघांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता. मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो. युतीसाठी प्रयत्न झाले, ते यशस्वी झाले आणि आम्ही सरकार बनवले, असे ते म्हणाले. भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केले होते. भिवंडीत झालेल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस स्वत: मला म्हणाले होते की तुमच्याकडे नवीन जबाबदारी येणार आहे. पण मला माहिती होतं की शिवसेना हे पद स्वीकरणार नाही. तेव्हा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असतं, तर ते मला द्यावं लागलं असतं. त्यामुळेच ते पद तेव्हा शिवसेनेनं नाकारलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
गणेशोत्सव काळात मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या गणेश मंडळांना आणि काही नेत्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्याचीही बरीच चर्चा झाली. त्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले ही सवय मला अगोदपासूनच आहे. मी सगळे गणेशोत्सव आणि कार्यक्रमांना उपस्थित राहतो. त्यात अचानक बदल केला असता तर लोक वेगळे काही बालले असते. थोडा त्रास होतो पण नियोजन करू असे त्यांनी सांगितले.