नवी दिल्ली – टीकटॉक स्टार आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सोनाली फोगट यांच्या गोव्यातील गूढ मृत्यूप्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. खाप पंचायतीमध्ये फोगट यांच्या भावाने आपल्या बहिणीच्या हत्या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे नेते कुलदीप बिश्नोई यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनाच जबाबदार धरले आहे. दरम्यान, पंचायतीने बिश्नोई यांना खाप पंचायतीसमोर आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्व खाप महापंचयातीचे प्रवक्ते संदीप भारती एएनआयशी बोलताना म्हणाले की, सोनाली फोगट यांच्या कुटुंबीयांनी ज्या प्रकारे आरोप केले आहेत त्यावरून कुलदीप बिश्नोई आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यामुळे त्यांनी महापंचायतीसमोर येऊन आपली बाजू मांडली पाहिजे व त्या कुटुंबाच्या शंका दूर केल्या पाहिजेत.
हिसार येथे झालेल्या महापंचायतीत बोलताना सोनाली यांचा भाउ रिंकू ढाका म्हणाला की, सोनालीच्या मृत्यूनंतर गोव्यातील आपल्या एका परिचिताला आपण इस्पितळात पाठवले होते. तो तेथे गेल्यावर सुधीर सांगवान त्याला भेटला. सुधीरने त्याला तुम्ही कुठून आलात असे विचारले. तेव्हा आपल्या माणसाने हिसार येथून आल्याचे सांगितले. त्यावर कुलदीप बिश्नोई यांनी पाठवले आहे का, असा सवाल त्याने केला. मात्र त्याने काही उत्तर दिले नाही.
संदीप भारती म्हणाले की खाप पंचायतीत आज पुन्हा एकदा बिश्नोई यांच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बिश्नोई यांनी आपली बाजू मांडावी. अन्यथा 23 तारखेला महापंचायत बोलावली जाईल व त्यात बिश्नोई यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल.