संयुक्तराष्ट्रे: संयुक्तराष्ट्रांच्या पंधरा सदस्यांच्या सुरक्षा मंडळात अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड निश्चीत झाली आहे. ही निवड सन 2021-22 सालासाठी असेल.
भारताने या पदासाठी अशिया -प्रशांत गटातून आपला अर्ज दाखल केला आहे. त्या गटातील एका जागेसाठी भारताचा एकच अर्ज आल्याने भारताची निवड निश्चीत मानली जात असून अशिया-प्रशांत गटातील चीन आणि पाकिस्तान सह 55 देशांनी भारताच्या उमेदवारीचा पुरस्कार केला आहे. त्यातील दुसरी जागा अफ्रिका गटातून भरली जाणार आहे.
या जागेसाठी दिग्बौती आणि केनिया या दोन देशांनी उमेदवारी दाखल केली आहे. संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेतील सदस्यांमध्ये मतदान घेऊन सुरक्षा मंडळावर एकूण दहा अस्थायी सदस्य देश निवडले जातात.या मंडळात पाच देश कायम स्वरूपी सदस्य आहेत, उर्वरीत दहा सदस्य नियमीत स्वरूपात बदलेले जातात आणि त्यात आळीपाळीने सर्व देशांना संधी दिली जाते.
या दहा सदस्यांपैकी अफ्रिका आणि अशियातील देशांमधून पाच सदस्य निवडले जातात, पूर्व युरोपिय देशांतून एक सदस्य, कॅरेबियन देश आणि लॅटिन अमेरिकेतून दोन सदस्य, पश्चिम युरोप व अन्य देशांतून दोन सदस्य असे दहा सदस्य अस्थायी म्हणून या मंडळावर निवडले जातात. त्यातील पाच सदस्यांची निवड यावेळी व्हायची आहे.