अहमदाबाद- मुंबईत 20 पेक्षा जास्त करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक शव घेण्यास आले नाही. मुंबईनंतर आता गुजरातमधील अहमदाबादमध्ये मुंबईसारखीच घटना समोर आली आहे. येथे करोना विषाणूच्या भीतीमुळे 17 करोना बाधित मृतांचे शव घेण्यास त्यांचे नार्तवाईक रुग्णालयात गेलेच नाहीत. 17 पैकी 12 मृतदेहांचे त्यांच्या नातेवाईकांची परवानगी घेऊन त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. पाच मृतदेह अजूनही बेवारस पडलेले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अगोदर मे महिन्यात 47 मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यातील 30 मृतदेह त्यांचे नातेवाईक घेऊन गेले. मात्र, काही मृतदेह बेवारस आहेत. रुग्णालयाने जेव्हा मृतदेहांच्या नातेवाईकांचा शोध घेतला तेव्हा 12 मृतदेहांच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला. त्यांच्या नातेवाईकांसोबत याबाबत बोलणे झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यांनी रुग्णालयालाच मृतदेहांवर अंत्यविधी करण्यास सांगितले. ते नातेवाईक अंत्यविधी वेळी हजरसुद्धा राहिले नाहीत. पाच मृतदेहांच्या नातेवाईकांचा अजूनही पत्ता सापडलेला नाही. 15-20 दिवसांत आणखी काही नवे मृतदेह रुग्णालयात आणले आहेत. नियमानुसार मृतदेहांना रुग्णालयात सात दिवसांपर्यंतच ठेवण्यात येते. जर मृतदेहाला कोणी घ्यायला आले नाही तर मृतदेह सरकारी नियमानुसार पोलिसांच्या ताब्यात दिला जातो. मात्र, तरीही रुग्णालय प्रशासनाने या आशेमुळे मृतदेहांना सांभाळून ठेवले आहे की, त्यांचे नातेवाईक या मृतदेहांना घ्यायला येतील.