नवी दिल्ली : चीनने सीमेवर संयम बाळगावा अन्यथा त्याचे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतील, असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी दिला. गलवान खोऱ्यात सोमवारी झालेल्या संघर्षानंतर प्रथमच दोन्हीदेशातील नेत्यांमध्ये उच्च स्तरीय चर्चा दूरध्वनीवर झाली. त्यावेळी ए. जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली.
प्रत्यक्ष सीमेवर लष्कराच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांत चर्चा सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. गेल्या आठवड्यापासून लष्कराच्या अधिकाऱ्यांमध्ये परिस्थिती पुर्ववत करण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यात काही प्रगती झाली आहे. गलवान खोऱ्यात आमच्या बाजूला केलेले काम नष्ट करावे असे चीनी बाजूचे म्हणणे आहे. हेच वादाचे कारण बनले आहे. त्यातून चीनने पूर्व नियोजित आणि योजनाबध्द कृती केली. त्यामुळे हिंसाचार निर्माण झाला. सध्या आहे ती स्थिती कायम ठेवण्याच्या आपल्यातील कराराचे उल्लंघन होईल, अशी कृती त्यातून चीकडून घडली, असे जयशंकर यांन चिीनी परराष्ट्र मंत्र्यांना ठणकावले.
या परिस्थितीचा दोन्ही देशातील संबंधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, याची जाणीव करून देण्यावर जयशंकर यांनी भर दिला. यावेळी चीनने त्यांच्या कृतीची सुधारणा करावी त्यासाठी योग्य ती पावले उचलावीत असे जयशंकर यांनी सांगितले.
दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात, दोन्ही बाजूकडून करारानुसार शांततेसाठी कार्यरत होण्यास मान्यता देण्यात आली. सहा जून रोजी ठरल्याप्रमाणे सैन्य मागे घेण्याची कृती करावी, असेही ठरल्याचे त्यांनी सांगितले.